उल्हासनगर : बिल्डिंगला पाणी न सोडल्याच्या रागातून सेक्रेटरीने वाॅचमनचा गळा दाबून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. उल्हासनगरमधील कॅम्प नंबर २ परिसरातील मेनका पॅलेस या बिल्डिंगमध्ये हा धक्कदायक प्रकार घडला आहे. विशेष म्हणजे हत्येला दोन दिवस झाले तरी देखील पालिसांनी आरोपीला अटक केली नाही.
उल्हासनगरच्या खेमानी भागात मेनका पॅलेस या इमारतीचा विक्की तलरेज हा सेक्रेटरी आहे. धक्कादायक म्हणजे वाॅचमन विकास याने सकाळी इमारतीला पाणी न सोडल्याने आणि इतर कामे उशिरा केल्याच्या रागातून सेक्रेटरी विक्की याने वाॅचमन विकास सोनार याला लाथाबुक्यांनी मारहाण करून त्याचा गळा दाबला. यात विकास याचा मृत्यू झाला.
माझ्या पतीची प्रकृती बरी नसल्याने तो सोमवारी सकाळी लवकर न उठता झोपला होता. इमारतीचा सेक्रेटरी विक्की तलरेज याने त्याला या बाबत विचारणा करून मारहाण करीत गळा दाबला त्यात आपल्या पतीचा मृत्यू झाल्याचा आरोप मयत वाॅचमन विकास सोनार याच्या पत्नीने केला आहे.
विकास आणि त्याचे कुटुंब याच इमारतीच्या तळ मजल्याला राहतात. याच ठिकाणी त्याची हत्या झाली. या प्रकरणी विकास याच्या पत्नीच्या फिर्यादीवरून उल्हासनगर १ नंबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, पोलिसांनी आरोपी विक्की तलरेजची यांची फक्त चौकशी केली आहे. या प्रकरणी ३०२ हत्येचा गुन्हा दाखल होऊन दोन दिवस लोटले तरी आरोपीला अटक करण्यात आली नाही. यावरून पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्न चिन्ह उपस्थित होत आहेत.
दरम्यान, माणसाचा संयम सुटल्याने तो कोणत्या स्थराला जातो हेच यातून स्पष्ट होतंय. मात्र एका क्षुल्लक कारणावरून कुटुंब प्रमुखाची हत्या झाल्याने सोनार कुटुंबाचा संसार उघड्यावर पडला आहे.
Post A Comment:
0 comments so far,add yours