मुंबई, 07 फेब्रुवारी : मुंबई काँग्रेसमधील कलह संपविण्यासाठी आता खुद्द पक्षाचे अध्यक्ष राहुल गांधी स्वत: लक्ष घालणार आहेत. प्रिया दत्त यांच्यानंतर मिलिंद देवरा यांनी देखील निवडणूक लढवणार नसल्याचे जाहीर केल्यामुळे मुंबई काँग्रेसमध्ये खळबळ उडाली होती. केवळ मिलिंद देवराच नाही तर कृपाशंकर सिंग, नसीम खान यांनी विद्यमान अध्यक्ष संजय निरूपम याविरोधात पुकारला बंड आहे.
निवडणूकीच्या तोंडावर काँग्रेसस पक्षातील कलह वाढू नये यासाठी थेट राहुल गांधी यांनी बैठक घेण्याचे ठरवले आहे. येत्या काही दिवसात होणाऱ्या या बैठकीत राहुल गांधी मुंबई काँग्रेसमध्ये सुरु असलेला वाद कमी करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. या बैठकीत मुंबईतील नेत्यांसह मल्लिकार्जून खरगे देखील उपस्थित असणार आहेत. मुंबईतील काँग्रेसच्या नेत्यांनी अंतर्गत कहल कमी करण्यासाठी बैठकीत समज दिली जाणार असल्याचे समजते. 
दोनच दिवसांपूर्वी मुंबई काँग्रेसमधले प्रॉब्लेम्स आता काही गुपित राहिलेलं नाही, असं सांगत काँग्रेसचे खासदार आणि राहुल गांधींच्या यंग ब्रिगेडचा भाग राहिलेले मिलिंद देवरा आपण कदाचित लोकसभा निवडणूक लढणार नाही, असं धक्कादायक विधान केलं होतं.
गेले काही महिने मुंबई काँग्रेसमध्ये वाद सुरू आहेत. याचा पहिला बळी खासदार मिलिंद देवरा यांच्या रूपात गेला असं म्हणता येईल. मुंबई काँग्रेसमध्ये असलेले वाद जगजाहीर आहेत हे खरं. लोकसभेच्या जागावाटपावरून पक्षात मतभेद आहेत. अनेक काँग्रेस नेते एकाच जागेसाठी आग्रह धरत असल्याने गेल्या आठवड्यात झालेल्या पक्षाच्या संसदीय समितीची बैठक कुठल्या उमेदवाराच्या निश्चितीशिवायच संपली.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours