भंडारा/वरठी: बहुतांशवेळा रेल्वे गाडी येण्याच्या वेळेपर्यंत प्रवाशांना तिकीट काढणे शक्य होत नाही. त्यामुळे प्रवास करणाऱ्यांपासून प्रवाशांना वंचित राहावे लागते. मोठ्या रेल्वे स्थानकांवर तिकीट खिडक्यांसमोर लागलेल्या रांगामुळे त्रास सहन करावा लागतो. ही समस्या कायम स्वरूपी दूर होणार असून प्रवाशांना आता स्वत:च्या स्मार्ट फोनवरून अनारक्षीत तिकीट काढता येणार आहे. ही सुुविधा रेल्वेतर्फे लवकरच होणार आहे.
२० दिवसांपूर्वी दक्षिण पूर्व मध्य रेल्वे विभागाने रेल्वे तिकीटावर सर्व रेल्वेस्थानकांची नावे मराठीत छापण्याचा निर्णय घेत १ मे पासून त्याची अंमलबजावणी करण्यात आली आहे.
त्यानंतर रेल्वे गाड्यांमध्ये प्रवास करण्यासाठी अनारक्षीत तिकीट स्मार्ट फोनवरून काढण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. स्मार्ट फोनवर अनारक्षीत तिकीट काढण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी दक्षिण पूर्व मध्य रेल्वे विभागाने चाचणी सुरू केली. यासाठी जीपीएस प्रणालीची मदत घेतली जाणार आहे. त्यासाठी मागील काही दिवसांपासून जीपीएस प्रणाली योग्य काम करीत आहे किंवा याची चाचणी घेतली जात आहे.
रेल्वे स्थानकाच्या अधिकाºयांनी दिलेल्या माहितीनुसार जीपीएस प्रणालीव्दारे अनारक्षीत तिकीट स्मार्ट फोनवर उपलब्ध करून देण्यासाठी घेण्यात आलेली चाचणी यशस्वी झाल्याचे सांगितले.
त्यामुळेच ही सुविधा प्रवाशांना त्यांच्या स्मार्ट फोनवर उपलब्ध करुन देण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे एखाद्याला रेल्वे स्थानकावर पोहचण्यासाठी उशिर झाला तरी स्वत:जवळील स्मार्ट फोनवरून अनारक्षीत तिकीट काढूृन प्रवास करता येणार आहे.
यासाठी रेल्वे स्थानकापासून तुम्ही २५ मीटर दूर असणे आवश्यक आहे. रेल्वे स्थानकावर पोहचल्यानंतर प्रवाशांना या सुविधेचा लाभ घेता येणार नाही.
स्मार्ट फोनवरून अनारक्षित तिकीट काढल्यानंतर रेल्वे प्रवास दरम्यान टीटीला स्मार्ट फोनवरून काढलेले तिकीट दाखविता येणार आहे. यामुळे रेल्वे स्थानकावर रांगेत लागून तिकीट काढण्याच्या समस्येपासून सुटका मिळणार आहे. आणि घरी बसून ज्याठिकाणी प्रवास करायचा आहे त्या गाडीचे शेड्युल पाहून तिकीट काढता येणार असल्याची सुविधा आहे.
असे काढता येणार अनारक्षित तिकीट
जर तुम्हाला एखाद्या ठिकाणी रेल्वे प्रवास करण्यासाठी अनारक्षीत तिकीट काढायचे असेल तर तुमच्याजवळ स्मार्ट फोन व तुमच्या मोबाईलमध्ये रिचार्जची रक्कम शिल्लक असणे आवश्यक आहे. त्यातूनच तिकीटाची रक्कम कपात केली जाणार आहे. मोबाईल क्रमांकासह तुमच्या बँकेचे खाते क्रमांक सुध्दा द्यावे लागणार आहे.
युटीएस अ‍ॅपद्वारे मिळेल सुविधा
स्मार्ट फोनच्या माध्यमातून अनारक्षित रेल्वे तिकीट बुक करण्यासाठी रेल्वेने एक युटीएस(अनारक्षित तिकीट प्रणाली) अ‍ॅप तयार केले आहे. हे अ‍ॅप मोबाईलमध्ये डाऊनलोड केल्यानंतर प्रवाशांना या सुविधेचा लाभ घेता येणार आहे. रेल्वे विभागाकडे युटीएस प्रणाली सुरुवातीपासूनच उपलब्ध आहे.मात्र त्याला जीपीएस प्रणालीशी सलग्न करण्याचे काम सुरू आहे. ही प्रकिया पूर्ण झाल्यानंतर स्मार्ट फोनवर तिकीट काढणे सुलभ होणार आहे.
अ‍ॅपमुळे प्रवास होतोय सुकर
रेल्वे विभागाने प्रवाशांच्या सुविधेसाठी विविध अ‍ॅप तयार केले आहेत. कोणत्या रेल्वे स्थानकावर कोणत्या गाड्या जातात, गाडीची नेमकी पोजीशन, रेल्वे स्थानकावर पोहचण्याची वेळ यासंबंधीची माहिती रेल्वेच्या ’व्हेअर ईज माय ट्रेन’ यासारख्या अ‍ॅपमुळे शक्य होत आहे. या अ‍ॅपमुळे प्रवाशांचा प्रवास सुकर होत असल्याचे चित्र आहे.
बिलासपूर येथे मंथन
स्मार्ट फोनवर अनारक्षीत तिकीट काढण्यासाठी सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी दक्षिण पूर्व मध्य रेल्वे मंडळातंर्गत येणाºया सर्व रेल्वे स्थानकाच्या वाणिज्य व्यवस्थापकांची बैठक १४ मे ला बिलासपूर येथे आयोजित केली होती. या बैठकीत या सुविधेविषयी मंथन झाले असून त्यानंतर याची अंमलबजावणी केली जाणार असल्याचे रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours