22 एप्रिल : गेले 2 दिवस उन्हाचा पारा थोडा उतरला असला तरी उद्यापासून ते बुधवारपर्यंत मुंबईकरांना पुन्हा एकदा उष्म्याचा त्रास सहन करावा लागणार आहे. या काळात मुंबईचे तापमान ३६ अंशांपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे.
शनिवारी सांताक्रूझ येथे कमाल तापमान ३4.2 अंश सेल्सिअस तर किमान तापमान २४.२ अंश नोंदवण्यात आले. मात्र केंद्रीय हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार सोमवार ते बुधवारपर्यंत मुंबईत उन्हाची काहिली वाढणार आहे. दरम्यान, विदर्भाला उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला असून, किमान बुधवारपर्यंत ही स्थिती कायम राहण्याचा अंदाज आहे. या उष्णतेच्या लाटेचा मुंबईवर मात्र फार परिणाम होणार नाही.
विदर्भात पुढील 3 दिवस उष्णतेची लाट येण्याची शक्यता कुलाबा वेधशाळेनं वर्तवली आहे. ज्याचा सर्वाधिक परिणाम चंद्रपूर, यवतमाळ, गडचिरोली भागांत जाणवणार आहे. याचबरोबर अकोला, चंद्रपूर, नागपूर, गडचिरोली, यवतमाळ, गोंदिया या जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
त्यामुळे विदर्भवासियांनी काळजी घेणं गरजेचं आहे. गरज असेल तर घराबाहेर पडा. शरीरातील पाण्याची पातळी योग्य राखण्यासाठी सरबत, पाणी पित रहा. आणि आरोग्याची काळजी घ्या.
तर दुसरीकडे पुढील काही दिवस कोकणातला समुद्र खवळलेला राहणार आहे. त्यामुळे कोकण किनारपट्टीवरील गावांना आणि मच्छीमारांना हवामान खात्यानं सतर्कतेचा इशारा दिलाय.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours