मुंबई, 08 जुलै: वसई माणिकपूर पोलीस स्टेशन हद्दीतील वसई पूर्व- पश्चिम मार्ग जोडणारा अंबाडी ओव्हर ब्रिज आज मध्यरात्रीपासून सुरक्षेच्या कारणास्तव पुढील आदेश होईपर्यंत बंद करण्यात येणार आहे. याबद्दल वरीष्ठ अनुभाग अभियंता (पूल) पश्चिम रेल्वे परेल मुंबई यांनी पालिकेला कळविले आहे. अंबाडी ओव्हर ब्रिज वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाचा असल्याने माणिकपूर पोलीस ठाण्यात रेल्वे विभाग, रेल्वे पोलीस विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, अधिकारी यांची मीटिंग झाली. या मीटिंगमध्ये पश्चिम रेल्वेचे सेक्शन इंजिनिअर यांनी अंबाडी ओव्हर ब्रिज मध्यरात्री 12 वाजल्यापासून वाहतुकीस बंद करण्यात आला आहे. पर्यायी मार्गाबाबत पोलीस निरीक्षक वाहतूक शाखा वसई यांना कळवण्यात आले आहे. नागरिकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा अशी सुचनाही त्यांच्याकडून देण्यात आली आहे. तसेच काही काळ वाहतुक कोंडी होणार असल्याने नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले आहे.
दरम्यान, आज मुंबईसह ठाणे, पालघर जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडत आहे. मुंबई शहर आणि उपनगरात शनिवारी रात्रीपासून मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. पावसाचा जोर वाढतच जात आहे. जोरदार पावसामुळे मुंबईतील अनेक भागांत पाणी साचायला सुरूवात झाली असून रस्त्यांवरची वाहतूक संथगतीनं सुरू आहे. मुंबईच्या दादर, लालबाग, परळ, वरळी, अंधेरी, जोगेश्वरी, मालाड, दहिसरमध्ये पावसाच्या जोरदार सरी सुरू आहेत. मुंबईसह ठाणे, पालघर जिल्ह्यातही जोरदार पाऊस सुरू आहे. मेट्रोच्या वेस्टर्न एक्स्प्रेस हायवे स्टेशन परिसरातही पाणी साचायला सुरूवात झाली आहे. गरज असल्यासच घराबाहेर पडण्याचा इशारा नागरिकांना देण्यात आला आहे. घाटकोपरमध्ये पूर्व- पश्चिमेला जोडणारा पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. रेल्वे पूल वाकला असल्याची शंका असल्याने सावधगिरीचा उपाय म्हणून हा पूल बंद केला आहे.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours