मुंबई, 27 जुलै : मराठा आरक्षणाबाबत गेल्या चार दिवसांपासून मराठा ठोक आंदोलनाचा राज्यभरात वनवा पेटला आहे. यावर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व मंत्री आणि मराठा आमदारांची बैठक बोलावली आहे.  मराठा आरक्षण संदर्भात भाजपाची बैठक शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या 'सेवासदन ' या निवासस्थानी होत आहे. सहकारमंत्री  सुभाष देशमुख, आमदार रवींद्र चव्हाण, गृहमंत्री रणजीत पाटील, बबनराव लोणीकर, भाजपचे आमदार आशिष शेलार तावडे यांच्या बंगल्यावर पोहचले आहे. त्याआधी 'वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री आणि महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांची बैठक झाली. काही वेळेत मुख्यमंत्री आणि चंद्रकांत पाटील हे सेवासदन इथं पोहोचणार आहे.
दरम्यान, आज दिवसभरात राज्यात आमदारांचे राजीनामा सत्र सुरुच असून, मराठा आंदोलनाला पाठिंबा दर्शवित राष्ट्रवादीचे आमदार रमेश कदम यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. अण्णाभाऊ साठे महामंडळ भ्रष्टाचार प्रकरणी ते सध्या मुंबईच्या ऑथर रोड तुरूंगात असून, त्यांनी थेट तुरूंगातुनच आपला राजीनामा विधान सभा अध्यक्ष यांच्याकडे पाठवला आहे. राज्यात आमदारांनी सुरु केलेल्या या स्टंटबाजीमुळे मराठा आंदोलनाला एक वेगळं वळण, एक वेगळी दिशा मिळाली आहे.
मराठा आरक्षण नावांखाली शिवसेनेचे हर्षवर्धन जाधव, राष्ट्रवादीचे चिकटगावकर, भाजपच्या सीमा हिरे आणि पंढरपूर-मंगळवेढाचे काँग्रेसचे आमदार भारत तुकाराम भालके यांच्या पाठोपाठ राष्ट्रवादीचे आमदार रमेश कदम यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिलाय. आतापर्यंत एकूण पाच आमदारांनी मराठा आरक्षणासाठी राजीनामा दिला आहे. राष्ट्रवादीचे आमदार रमेश कदम हे मोहोळ मतदारसंघाचे आहेत. रमेश कदम हे मराठा नाहीत, तरिही त्यांनी मराठा आरक्षण आंदोलनाला समर्थन दिल्याने राजकीय गोटात एक वेगळीच चर्चा सुरू झाली आहे.
काँग्रेसचे आमदार भारत भालके यांचा राजीनामा
आतापर्यंत एकूण तीन आमदारांनी मराठा आरक्षणासाठी राजीनामा दिला आहे. आज पंढरपूर-मंगळवेढाचे काँग्रेसचे आमदार भारत भालके यांनी सुद्धा राजीनामा दिलाय. मराठा, धनगर, महादेव कोळी आणि मुस्लिम समाजाला वेळोवेळी आरक्षण मिळावे अशी मागणी वारंवार होत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आतापर्यंत तोंडी आश्वासन दिलं पण याची पूर्तता झाली नाही. त्यामुळे मराठा आरक्षणाचे आंदोलन पेटले असताना मला लोकप्रतिनिधी म्हणून या पदावर राहण्याचा नैतिकता वाटत नाही असं भालके यांनी सांगितलंय. त्यांनी आपला राजीनामा विधानसभा अध्यक्षांकडे फॅक्सद्वारे पाठवला आहे.
मराठा आरक्षणाचा अध्यादेश काढाच!, शिवसेना आमदाराचा राजीनामा
गेल्या चार दिवसांपासून मराठा ठोक आंदोलन राज्यभरात सुरू आहे. मराठा आरक्षणासाठी शिवसेनेचे कन्नडचे आमदार हर्षवर्धन जाधव यांनी 24 जुलै रोजी ठिय्या आंदोलन केलं होतं. आणि सरकारने मराठा आरक्षणाचा अध्यादेश 24 तासात काढावा अशी मागणी केली होती. मागणी मान्य न झाल्यामुळे हर्षवर्धन जाधव यांनी आपला राजीनामा ई-मेलद्वारे विधानसभा अध्यक्षांना पाठवला. त्यांच्यापाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार भाऊसाहेब चिकटगावकर यांनीही राजीनामा दिलाय. दोन्ही आमदारांनी विधानसभा अध्यक्षांकडे राजीनामा सोपवलाय. भाऊसाहेब चिकटगावकर हे राष्ट्रवादीचे वैजापूरचे आमदार आहेत. मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे तोपर्यंत आपण स्वस्थ बसणार नाही असं चिकटगावकर यांनी सांगितलं.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours