नागपूर: नागपूर जिल्ह्याला अवकाळी पावसानं झोडपलंय. दोन दिवस सुरू असलेल्या या पावसामुळे धानपिकासह अन्य पिकांचं अतोनात नुकसान झालं आहे. यवतमाळ जिल्ह्यात हजेरी लावल्यानंतर आज नागपूर जिल्ह्याला झालेल्या धुव्वाधार पावसामुळे धान, कपाशी आणि तूर पिकांना मोठा फटका बसला आहे.
नागपूर, गडचिरोली जिल्ह्यांसह विदर्भाच्या बहुतांश जिल्ह्यांत दोन दिवसांपासून कोसळणाऱ्या अवकाळी पावसामुळे धान, कपाशी, तूर, सोयाबिन पिकासह अन्य पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील कळमना येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात शेतकऱ्यांनी विक्रीसाठी आणलेले धानाचे हजारो पोते पावसामुळे भिजले आहे. शेकडो क्विंटल सोयाबीन आणि तूर सुद्धा या पावसामुळे भिजली आहे. वर्षभर राब-राब राबून उगवलेलं पिक एका पावसात मातीमोल झाल्यामुळे आधीच दुष्काळाच्या छायेत वावरणाऱ्या शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान झालं आहे. हजारो क्विंटल सोयाबिन आणि तूर सडल्यामुळे ते विक्रीच्या प्रतिक्षेत असलेल्या शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं आहे.
कृषी उत्पन्न बाजार समितीत दर वेळेस अवकाळी पावसामुळे असंच धान्य भिजतं. त्यासाठी कुठल्याही उपाययोजना येथे करण्यात आल्या नसल्याने त्याचा फटका शेतकऱ्यांना बसतो. आधीच शेतमाल खरेदी होत नसल्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. त्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. नागपूरच्या जवाहरलाल नेहरू मार्केट यार्डमध्ये एक लाख पोती धान विकण्यासाठी शेतकर्यांनी आणली होती. यापैकी जवळपास अर्धापेक्षा जास्त पोती उघड्यावर आहेत त्यातील पन्नास टक्के पोती भिजली आहे.
Post A Comment:
0 comments so far,add yours