मुंबई, 28 डिसेंबर : मराठा क्रांती मोर्चामधील आंदोलकांवर चुकीच्या पद्धतीने गुन्हे दाखल झालेल्या घटनांची फेरचौकशी करा, असा आदेश गृहराज्यमंत्री (ग्रामीण) दीपक केसरकर यांनी दिले आहे. आंदोलकांवरील खोटे गुन्हे मागे घ्या अन्यथा पुन्हा आंदोलन करू, असा इशारा मराठा क्रांती मोर्च्याकडून देण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर सरकारने आता पावलं उचलायला सुरुवात केली आहे.
'चुकीचे गुन्हे दाखल केले असतील तसंच सहभागी नसलेल्या आंदोलकांवरही गुन्हे दाखल करण्यात आले असतील तर 15 दिवसात अहवाल द्या, असा आदेशही दीपक केसरकर यांच्याकडून देण्यात आला आहे. त्यानंतर आता आंदोलकांवरील विशिष्ट गुन्हे मागे घेण्याची प्रक्रिया सुरू झाली असल्याची माहिती आहे.
आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याशिवायच मराठा आरक्षण लागू होत नाही तोपर्यंत मेगाभरती करू नका, अशीही मराठा क्रांती मोर्च्याची मागणी आहे.'जोपर्यंत मराठा आरक्षण लागू होत नाही तोपर्यंत मेगाभरती करू नका, अन्यथा पुन्हा 2014 सारखी परिस्थिती निर्माण होईल,' असा इशारा देणारं पत्र मराठा ठोक मोर्चा समन्वयक आबासाहेब पाटील यांनी काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांना लिहिलं होतं.
मराठा आरक्षण लागू होण्याआधीच जर मेगाभरती करण्यात आली तर तणाव निर्माण होईल. यातून राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था बिघडेल आणि त्याला संपूर्णपणे सरकारच जबाबदार असेल, असं या आंदोलकांच्या पत्रात म्हणण्यात आलं होतं
Post A Comment:
0 comments so far,add yours