मुंबई: भारत आणि पाकिस्तान दरम्यानच्या तणावाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान भवनातच आज तातडीची बैठक घेतली. या बैठकीला मुंबईचे पोलिस आयुक्त सुबोध जयस्वाल, पोलीस महासंचालक दत्ता पडसलगीकर आणि गृहमंत्रालयाचे ज्येष्ठ अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत मुंबई आणि राज्यातल्या सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेण्यात आला.
मुंबई ही भारताची आर्थिक राजधानी आहे. स्टॉक मार्केट आणि जगभरातल्या प्रमुख कंपन्यांची ऑफिसेस मुंबईत आहेत. त्यामुळे मुंबईची सुरक्षा व्यवस्थेला सर्वात जास्त महत्त्व दिलं जातेय. खबरदारीचा उपाय म्हणून या आधीच पोलिसांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
मुंबई विमानतळं, सर्व रेल्वे स्थानके आणि महत्त्वांच्या आस्थापनांना सुरक्षा व्यवस्था प्रदान करण्यात आली आहे. तर नौदलाचं मुख्यालय मुंबईत असून त्यांनाही हाय अलर्टवर ठेवण्यात आलंय.
भारत आणि पाकिस्तानमधल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर परराष्ट्रमंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार यांनी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. पाकिस्तानचे सर्व दावे फेटाळून लावत त्यांनी भारताने पाकिस्तानचे एक लढाऊ विमान पाडल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला.
Post A Comment:
0 comments so far,add yours