बुलडाणा, 8 मे : विदर्भासह महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेली भेंडवळची घटमांडणी करण्यात आली आहे. घटमांडणीनंतर रात्रीतून घटामध्ये झालेल्या बदलाचे निरीक्षण करून सारंगधर महाराज आणि पुंजाजी महाराज यांनी यंदाच्या पीक-पाण्याची भविष्यवाणी जाहीर केली आहे. महाराष्ट्रात यंदाही सरासरीपेक्षा कमी पाऊस होईल, असा अंदाज या घटमांडणीनंतर व्यक्त करण्यात आला आहे.
गेल्या वर्षी महाराष्ट्रातील विविध भागात कमी पाऊस झाला. त्यानंतर यंदातरी वरूणराजा साथ देणार का, याकडे शेतकऱ्यांचं लक्ष लागलं आहे. पण भेंडवळच्या घटमांडणीत व्यक्त केलेल्या अंदाजानुसार यंदाही महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण कमी राहणार आहे.
घटमांडणीनंतर काय अंदाज व्यक्त करण्यात आला?
पावसाची स्थिती मध्यम राहण्याची शक्यता
पिकांची स्थिती सर्वसाधारण राहण्याचा अंदाज
देशाला आर्थिक संकटाला सामोरं जावं लागणार
अवकाळी पाऊस आणि चाराटंचाईची भीती
देशात घुसखोरी कायम राहणार पण संरक्षणखातं सक्षमपणे उत्तर देणार
काय आहे भेंडवळची घटमांडणी?
भेंडवळ इथं होणाऱ्या या घटमांडणी वर शेतकर्‍यांचा विशेष विश्वास आहे. येत्या हंगामात पीकपरिस्थिती, पाऊस, सामाजिक, राजकीय आणि आर्थिक परिस्थितीचा अंदाज, देशावरील संकटे, शत्रूंच्या कारवाया, राजाची गादी टिकणार काय, अशा सर्व प्रश्नांबाबत इथं अंदाज व्यक्त करण्यात येतात. हे ऐकण्यासाठी हजारो शेतकरी भेंडवळला जमतात.
भेंडवळच्या घटमांडणीला सुमारे तीनशे वर्षांपेक्षाही जुनी परंपरा असून चंद्रभान महाराज वाघ यांनी घटमांडणीची सुरुवात केली. आधुनिक यंत्रणा कितीही सुसज्ज असल्या तरी आजही घटमांडणीची परंपरा तेवढय़ाच विश्‍वासाने जपली जात आहे. त्यामुळे या घटमांडणीकडे संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकर्‍यांचे लक्ष लागून असते.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours