कोलकाता, 15 मे : भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्या रॅलीतील मोठ्या हिंसाचारानंतर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी पश्चिम बंगालमध्ये जाहीर सभा घेणार आहेत. बंगालच्या हसनाबाद आणि डायमंड हार्बर या दोन ठिकाणी नरेंद्र मोदी आपल्या कार्यकर्त्यांना संबोधित करतील.
लोकसभा निवडणुकीदरम्यान पश्चिम बंगालमध्ये भाजप आणि तृणमुल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा हिंसाचार सुरू आहे. अमित शहा यांच्या रॅलीतही मोठा हिंसाचार झाल्याचं पाहायला मिळालं. या पार्श्वभूमीवर नरेंद्र मोदी यांच्या बंगालमधील सभांकड सर्वांचं लक्ष लागलं आहे.
अमित शहांच्या रॅलीत तुफान राडा
पश्चिम बंगालची राजधानी कोलकात्यात भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहांच्या वाहनावर रोड शोदरम्यान हल्ला झाला. तृणमूल आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान हाणामारी झाली. यावेळी जाळपोळ आणि दगडफेकदेखील करण्यात आली.
'आमच्या रॅलीत मोठ्या प्रमाणात लोकं सहभागी झाले होते, त्यामुळे तृणमूलचे कार्यकर्त्यांनी आमच्यावर हल्ला केला. बंगालच्या जनतेनं ही गुंडगिरी वेळीच रोखलं पाहिजे,' अशी प्रतिक्रिया या गदारोळानंतर अमित शहा यांनी दिली आहे. 
कोलकात्यातील रक्तरंजित राड्यानंतर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही नंतर घटनास्थळाला भेट परिस्थितीचा आढावा घेतला. 
दरम्यान, लोकसभा निवडणुकीत भाजपने यंदा पश्चिम बंगालमध्ये विशेष लक्ष केंद्रित केलं आहे. अमित शहा हे सातत्याने बंगालमध्ये तळ ठोकून आहेत. सत्तास्थापनेसाठी आवश्यक असलेली मॅजिक फिगर गाठण्यासाठी यावेळी भाजपला बंगालमध्ये चांगली कामगिरी करणं गरजेचं ठरणार आहे. गेल्या काही दिवसांपासून पश्चिम बंगालमधील राजकीय संघर्षानं टोक गाठलं आहे. त्यातून हिंसाचाराचेही अनेक प्रकार घडले आहेत. 
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours