मुंबई, 7 मे : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामना संपादकीयमधून राज्यातील दुष्काळी परिस्थिती आणि त्यावरून सुरू असलेल्या राजकारणावर भाष्य केलं आहे. विरोधक दुष्काळाचे राजकारण करू पाहत, असा आरोपही त्यांनी केला आहे. ''महाराष्ट्रावर कोसळलेले दुष्काळाचे संकट गंभीरच आहे. मात्र त्यावरून राजकीय पोळ्या भाजणे योग्य नाही. उलट दुष्काळाच्या संकटाचा मुकाबला करण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांनी एकत्र येऊन दोन हात केले पाहिजेत. सरकार तर काम करते आहेच, पण विरोधी पक्ष, दानशूर लोक आणि स्वयंसेवी संस्था या सगळ्यांनीच सरकारच्या खांद्याला खांदा लावून दुष्काळग्रस्तांचे अश्रू पुसले पाहिजेत. प्रसंग बाका आहे. त्यामुळे टीका करण्यापेक्षा दुष्काळग्रस्त भागात आपण काय काम करू शकतो याचा विचार प्रत्येकानेच करायला हवा!'', अशा शब्दांत त्यांनी दुष्काळावर राजकारण न करण्याचं आवाहन केलं आहे.
दरम्यान, राज्यातील मतदान प्रक्रिया उरकल्यानंतर आता सर्वच राजकीय नेत्यांना दुष्काळी परिस्थितीची आठवण झाल्याचं पाहायला मिळत आहे.
Post A Comment:
0 comments so far,add yours