मुंबई, 20 सप्टेंबर : महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणूक तारखांची लवकरच घोषणा होणार होणार आहे. त्याआधी शिवसेना-भाजपने जागावाटपाच्या नव्या फॉर्म्युल्यावर शिक्कामोर्तब केलं असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. शिवसेना नेत्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत केलेल्या चर्चेनंतर हा फॉर्म्युला निश्चित करण्यात आला. त्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही या फॉर्म्युल्याला हिरवा कंदील दाखवला, अशी माहिती आहे.
भाजप-शिवसेना युतीच्या नव्या फॉर्म्युल्यानुसार भाजप आणि मित्रपक्षांच्या वाट्याला 162 जागा मिळाल्या आहेत, तर शिवसेना 126 जागा लढवणार असल्याची माहिती आहे. शिवसेना नेते सुभाष देसाई आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात जागावाटपाबाबत चर्चा झाली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा सांगावा घेऊन शिवसेना नेते वर्षा या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी दाखल झाले होते. त्यानंतर झालेल्या चर्चेनंतरच हा फॉर्म्युला निश्चित करण्यात आल्याची माहिती आहे. मात्र शिवसेना-भाजप युतीच्या जागावाटपाची अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.
मुख्यमंत्रिपदाबाबत शिवसेनेचा पत्ता कट?
एकीकडे युतीच्या जागावाटपाची चर्चा सुरू असताना दुसरीकडे भाजपच्या सर्वच नेत्यांकडून देवेंद्र फडणवीस हेच पुन्हा मुख्यमंत्री होईल, असा दावा केला जात आहे. शिवसेना नेत्यांकडून युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांना मुख्यमंत्रिपदासाठी प्रोजेक्ट करण्याच्या खेळीला हाणून पाडण्याचा भाजपचा हा प्रयत्न आहे का, अशी चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे सत्तेत समान वाटा हवा, या शिवसेनेच्या मागणीला भाजपकडून प्रतिसाद मिळत नसल्याचंच दिसत आहे.
'देवेंद्र फडणवीसांनी आपल्या मुख्यमंत्रिपदाची पाच वर्ष यशस्वीरित्या पूर्ण केली आहेत. आता पुन्हा एकदा तेच मुख्यमंत्री होतील आणि सर्वाधिक काळ महाराष्ट्राचं मुख्यमंत्रिपद भूषवण्याचा विक्रमही ते मोडतील,' असा विश्वास भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत भाजपच्या 'महाजनादेश यात्रे'चा नाशिकमध्ये गुरुवारी समारोप झाला. यावेळी भाजपच्या सर्वच नेत्यांनी पुन्हा सत्ता संपादन करण्याचा दावा केला आहे.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours