मुंबई, 5 सप्टेंबर : मुंबई आणि उपनगरांमध्ये सोमवारपासून (2 सप्टेंबर) धुमशान घातलेल्या पावसाचा जोर मध्यरात्रीपासून ओसरला आहे. मुसळधार पावसामुळे कोलमडलेली तिन्ही मार्गावरील लोकल सेवा पुन्हा सुरू झाली आहे. पहाटेपासून तिन्ही रेल्वे मार्गावरील लोकल धावू लागल्या असून वाहतूक हळूहळू पूर्वपदावर येत आहे. यामुळे बुधवारी घराकडे पोहोचू न शकणाऱ्या नागरिकांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे. सीएसएमटीहून कर्जतकडे जाणारी लोकल सेवा सुरू करण्यात आली आहे. पहाटे 3.17 वाजता अंबरनाथच्या दिशेनं पहिली लोकल रवाना करण्यात आली.
मुंबईसह उपनगरात बुधवारी सकाळपासून जोरदार पाऊस सुरू होता. यामुळे सखल भागांमध्ये पाणी साचून जनजीवन विस्कळीत झालं होतं. मुसळधार पावसाचा फटका रस्तेसह रेल्वे वाहतुकीला बसला होता. सायन-कुर्ला-चुनाभट्टीदरम्यान ट्रॅकवर पावसाचं पाणी साचल्यानं मध्य रेल्वे पूर्णतः ठप्प झाली होती. मुसळधार पावसाचा इशारा पाहता मुंबई, ठाणे आणि कोकणातील शाळा-महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
Post A Comment:
0 comments so far,add yours