पुणे, 30 मे : नवं शैक्षणिक वर्ष कधी सुरू होणार? शाळा कशा भरणार? मुलांना प्रत्यक्ष शाळेत जावं लागणार की ऑनलाइन वर्ग भरणार? असे अनेक प्रश्न पालकांना पडले असताना त्याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. कोरोना संकटकाळात पालक आणि मुख्याध्यापकांची मुलांबाबत असलेली काळजी लक्षात घेऊन राज्यातील शाळा 1 जुलैला सुरू करण्याबाबत राज्य सरकारचा विचार सुरू आहे अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी दिली.

या निर्णयामुळे राज्यात जून महिन्यात शाळा सुरू करण्याच्या विविध चर्चांना आता पूर्णविराम मिळाला असून, पालक, शिक्षक, कर्मचारी आणि मुख्याध्यापकांना तात्पुरता दिलासा मिळाला आहे. राज्यात कोरोनाचा प्रसार दिवसेंदिवस वाढत आहेत. या संसर्गाची साखळी तोडण्यासाठी संपूर्ण देश लॉकडाऊन आहे. त्यात शाळा, कॉलेजदेखील पुढच्या महिन्यापर्यंत बंद करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.

करोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील शाळा कधी सुरू होतील, या प्रश्नाबाबत पालक आणि मुख्याध्यापकांची सातत्याने चर्चा सुरू आहे. याबाबत राज्य सरकारच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या अनुशंगाने नगरसेविका अश्विनी कदम यांनी अजित पवार यांच्याशी दूरध्वनीद्वारे चर्चा केली. त्यावेळी पवार यांनी शाळा सुरू होण्याबाबत सविस्तर माहिती दिली.

पवार म्हणाले की, राज्य सरकारचे जून महिन्यात शाळा सुरू करण्याबाबत अजिबात काही ठरलेले नाही. मी कालच शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्याशी चर्चा केली आहे. आमचा 1 जुलैला शाळा सुरू करण्याबाबत विचार सुरू आहे. त्याबाबत अंतिम कोणताही निर्णय झालेला नाही. 1 जुलैला शाळा सुरू केल्यानंतरही सुरुवातीचे काही दिवस बुडतील. या सर्व बुडालेल्या दिवसांची भरपाई ही दिवाळी आणि ख्रिसमसची सुट्टी कमी करून करता येईल.

एप्रिल महिन्यात उन्हाळी सुट्ट्यादेखील कमी करून शैक्षणिक दिवस भरून काढण्याबाबत विचार सुरू आहे, अशी माहिती पवार यांनी दिली आहे. दरम्यान, करोनाचा प्रादुर्भाव कमी न झाल्यास, शाळा 15 जुलैनंतर सुरू होण्याची शक्यता नाकारता येणार नाही.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours