मुंबई, 27 मे : कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून लाकडाउन करण्यात आले. राज्यात लॉकडाउन सुरू झाल्यापासून राज्यात आतापर्यंत कोविड संदर्भात अत्यावश्यक सेवेसाठी 4,30,670 पास  पोलीस विभागामार्फत देण्यात आले. तसंच 5, 65,726 व्यक्तींना क्वारंटाइन (Quarantine) करण्यात आले आहे, अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे.
राज्यात लॉकडाउनच्या म्हणजे दिनाक 22 मार्च ते 25 मे या कालावधीत कलम 188 नुसार 1,15,263  गुन्हे नोंद झाले असून 23,204 व्यक्तींना अटक करण्यात आली आहे. विविध गुन्ह्यांसाठी 5 कोटी 48 लाख 62  हजार 947 रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे.
कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी आपले पोलीस दल, आरोग्य विभाग, डॉक्टर्स, नर्सेस अहोरात्र मेहनत घेत आहेत. परंतु, काही दुष्ट प्रवृत्ती त्यांच्यावर हल्ला करीत आहेत. अशा हल्लेखोरांविरुद्ध कडक कारवाई करण्याचे आदेश पोलीस विभागाला देण्यात आलेले आहेत. या दरम्यान पोलिसांवर हल्ला होण्याच्या 248 घटना घडल्या. त्यात 830  व्यक्तींना ताब्यात घेतले असून पुढील कारवाई सुरू आहे.
पोलीस विभागाचा 100 नंबर हा सर्व जिल्ह्यात 24 तास कार्यरत असतो. लाॅकडाउनच्या काळात या फोनवर 95, 911  फोन आले, त्या सर्वांची योग्य ती दखल घेण्यात आली. तसंच राज्यभरात पोलिसांनी ज्यांच्या हातावर Quarantine असा शिक्का आहे अशा 695  व्यक्तींना शोधून त्यांना विलगीकरण कक्षात पाठविले. राज्यात एकूण 5, 65,726  व्यक्ती Quarantine आहेत. अशी माहिती  देशमुख यांनी दिली.
या काळात अवैध वाहतूक करणाऱ्या 1322  वाहनांवर गुन्हे दाखल करण्यात आले व 72, 687 वाहने जप्त करण्यात आली. तसंच परदेशी नागरिकांकडून झालेले व्हिसा उल्लंघनचे 15 गुन्हे राज्यभरात नोंदवले आहेत.
आतापर्यंत 20 पोलिसांचा मृत्यू
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नात दुर्देवाने मुंबईतील 11 पोलीस व 1 अधिकारी अशा एकूण 12, पुणे 2, सोलापूर शहर 2, नाशिक ग्रामीण 2, ए.टी.एस.1, ठाणे ग्रामीण 1 अशा 20 पोलीस वीरांना आपला जीव गमवावा लागला. पोलिसांना जर कोरोना संदर्भातील काही लक्षणे दिसून आली तर त्यांच्यावर तातडीने उपचार व्हावेत, याकरिता राज्यात सर्वत्र नियंत्रण कक्ष स्थापन केले आहेत.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours