मुंबई: हिंसक आंदोलन करणाऱ्या मराठा मोर्चाविरोधात अलीबागचे शेतकरी द्वारकानाथ पाटील यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर 13 ऑगस्टला सुनावणी होणार आहे. राज्यभरात सुरु असलेल्या मराठा समाजाच्या मोर्चांवर प्रतिबंध घालावा आणि सार्वजनिक संपत्तीची नासधूस करणाऱ्या आंदोलकांवर दंडात्मक कारवाई करण्याची मागणी द्वारकानाथ पाटील यांनी केलीय. दरम्यान मराठा मोर्चाच्या वतीनं ज्येष्ठ वकील सतीश मानेशिंदे हायकोर्टात बाजू मांडणार आहेत.
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी शांततेच्या मार्गानं राज्यव्यापी बंद पुकारण्याचं आवाहन सकल मराठा समाजाच्या वतीनं करण्यात आलं होतं. त्या आवाहनाला साद देत आज सकाळी राज्यभरात ठिकठिकाणी बंद पुकारण्यात आला. घोषणाबाजी सोडली तर सुरूवातीला आंदोलन ठरल्याप्रमाणे शांततेत सुरू होतं. मात्र, घडाळ्याच्या काटा जसजसा पुढे सरकू लागला तसतसं मराठा आंदोलन तापत गेलं आणि शांततेत सुरु असलेल्या आंदोलनाला अनेक ठिकाणी गालबोट लागलं. पुण्यात जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलकांनी दगडफेक केली. तिकडे लातूरमध्येही मराठा आंदोलनाला गालबोट लागलं. काँग्रेस आमदार त्र्यंबक भिसेंच्या गाडीवर दगडफेक करण्यात आली. त्याचप्रमाणे औरंगाबादेतही वाळूंज एमआयडीसीत आंदोलकांनी टँकर फोडला. नांदेडमध्ये उमरी स्टेशनवर आंदोलकांनी तोडफोड केल्यानं रेल्वेचं मोठं नुकसान झालंय. तसंच नाशकातही आंदोलकांच्या दोन गटांमध्ये हमरीतुमरी झाली.
आंदोलनाला दुपारनंतर अचानक हिंसक वळण मिळालं. हिंसक आंदोलनाचा सर्वात मोठा फटका पुणे, औरंगाबाद, नागपूर आणि लातूरला बसला. एक्सप्रेसवेसह अनेक ठिकाणी रास्ता रोको करण्यात आला. औरंगाबाद-नागपूरमध्ये रेलरोको करण्यात आला. हिंगोली लातूरमध्ये जाळपोळ करण्यात आली. काही ठिकाणी पत्रकार आणि आमदारांना धक्काबुक्की आणि मारहाण करण्यात आली. सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान न करण्याच्या निर्धारानं पुकारण्यात आलेल्या बंदला या घटनांमुळं गालबोट लागलं.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours