मुंबई: राज्यातलं मराठा आंदोलन बदनाम करण्याचा प्रयत्न होतोय. तसंच मराठा आणि बहुजन समाजात फूट पाडण्याचा डाव असल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलाय. एका पत्रकाद्वारे शरद पवारांनी सरकारवर हे आरोप केले आहे. राज्यकर्त्यांची ही योजना यशस्वी होऊ न देण्याची खूणगाठ मनाशी बांधा, असं आवाहनही शरद पवार यांनी केलंय.
गेल्या काही दिवसांपासून मराठा आरक्षणासाठी मराठा समाज रस्त्यावर उतरलाय. अनेक ठिकाणी जाळपोळ आणि तोडफोडीच्या घटना घडल्यात. शरद पवार यांनी आज एक पत्र लिहून मराठा समाजाला शांततेचं आवाहन केलंय.   छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श ठेवून मराठा समाज आंदोलन करतो आहे. अशा वेळी हिंसा, जाळपोळ, दंगे आणि सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करण्याचे प्रकार टाळले पाहिजेत. आत्तापर्यंत शांततेने चाललेल्या आंदोलनाला सर्वसामान्यांचा पाठिंबाच मिळाला आहे. त्याला धक्का लागेल अशी काही कृती करू नका असं आवाहन शरद पवार यांनी आपल्या पत्रकाद्वारे केले आहे.
पवारांनी नेमकं काय म्हटलंय ?
मराठा आरक्षणाच्या मागणीला कोणाचीच हरकत नाही. परंतु कोणताही पूर्वग्रह न ठेवता स्वच्छ मनाने तसंच राज्यघटनेने ज्यांना आरक्षण दिलेले आहे त्याला धक्का न लावता मराठा आरक्षणाचा निर्णय झाला पाहिजे. त्याचप्रमाणे हिंसा, जाळपोळ, दंगे आणि सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करण्याचे प्रकार सक्तीने टाळले गेले पाहिजे. आतापर्यंत शांततेने पार पडलेल्या मराठा आंदोलनाला सर्वसामान्यांचा आणि बहुजनांचा पाठिंबा सदिच्छा प्राप्त झाल्या, त्याला धक्का लागेल असा प्रकार होणार नाही याची खबरदारी सर्व संबंधितांनी घेतली पाहिजे.
येथे हे नमूद करणे आवश्यक आहे की, राज्यकर्ते आणि हितसंबंधी घटक या आंदोलनाला बदनाम करणे तसंच मराठा आणि अन्य बहुजन समाजात फूट पाडण्याचा डाव खेळत आहे. मराठा समाजाला इतर समाजापासून वेगळे आणि एकाकी पाडण्याचा राज्यकर्त्यांचा प्रयत्न आहे आणि त्यांची ही योजना यशस्वी होऊ देता कामा नये याची पक्की खूणगाठ आंदोलकांनी ठेवली पाहिजे. त्यांच्या या खेळीला आंदोलकांनी बळी पडू नये. ज्या छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श समोर ठेवून हे आंदोलन केले जात आहे. त्या छत्रपतींनी अठरापगड जातींना, बारा बलुतेदारांना बरोबर घेऊन आदर्श स्वराज्य निर्माण केले होते. त्या आदर्शांना धक्का लागेल असे आचरण आपल्या हातून घडणार नाही यांची खबरदारी आंदोलनकर्त्यांनी घेतली पाहिजे. हिंसाचाराच्या ताज्या घटनांमुळे सुरुवातीला शांततामय मार्गाने आंदोलन झाल्याबद्दल निर्माण झालेली समाजातील सदिच्छा गमावणे हे चांगले लक्षण नाही, हे मी विशेषत्वाने नमूद करू इच्छितो.
गोखले अर्थ-राज्यशास्त्र संस्थेने शेतकरी आत्महत्यांच्या संदर्भात केलेल्या पाहणीत मराठा समाजाबद्दलची विदारक स्थिती मांडण्यात आली आहे. कुटुंबाच्या विस्तारानुसार जमिनीचे लहान-लहान तुकडे पडत गेल्याने शेती किफायतशीर राहिली नाही. यातून आलेल्या आर्थिक हलाखीमुळे पुरेसे शिक्षण नाही आणि नोकऱ्याही नाहीत. अशा दुष्टचक्रात तरूण सापडला आहे. या आकडेवारीवर नजर टाकल्यात दारूण वस्तुस्थितीची माहिती होईल. मराठा समाजातील भूमीहीनांची टक्केवारी सर्वाधिक म्हणजे अठ्ठावीस टक्के आहे. काठावरचे किंवा अत्यल्पभूधारक (मार्जिनल – ०.१ ते २.५ एकर) ५३ टक्के, अल्पभूधारक (२.५ ते ५ एकर) ५८ टक्के, (५ ते १० एकर जमिन असणारे) ६३ टक्के आहेत. त्याचप्रमाणे या ६० टक्के जमिनींना हमखास पाणीपुरवठा नाही. यातून ही समस्या चिघळत गेली आहे.
आत्महत्यांचे प्रमाण ४६ टक्के आहे हे पूर्वी समोर आलेलेच आहे. वर्षानुवर्षांच्या या वंचनेमुळे मराठा समाजात व विशेषत: युवकांच्या मनात राग साठणे नैसर्गिक असले तरी जाळपोळ दगडफेक करणे किंवा आत्महत्या करणे हा मार्ग नक्कीच नाही.
एखादे आंदोलन सुरू केल्यानंतर कोठे थांबावे याचा विचार करायचा असतो. हा विचार केल्याबद्दल अभिनंदन. या आंदोलनामुळे मराठा समाजाच्या तीव्र भावना देशासमोर आल्या आहेत. या मागण्या पूर्ततेच्या संदर्भात काही वैधानिक प्रक्रियेची आवश्यकता आहे. यासाठी उचित वेळ आवश्यक आहे. यापुढे आरक्षणाच्या अंमलबजावणी संदर्भात लागणारा वेळ, राज्यशासन आणि विधिमंडळ प्रक्रिया आवश्यक आहे. त्यासाठी शांतता हवी आहे. तसेच राज्यातील औद्योगिक क्षेत्रास आंदोलनाची झळ पोहोचणार नाही ह्याची काळजी घ्यायला हवी. अशा आंदोलनाने राज्यातील उद्योगधंद्यातील गुंतवणूक थांबेल व बेरोजगारीचा प्रश्न अधिक गंभीर होईल. म्हणूनच मराठा आंदोलनकर्त्यांनी शांततेला सर्वोच्च प्राधान्य द्यावे - शरद पवार
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours