डोंबिवली 11 ऑक्टोबर : 'भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्रातील 8 खासदार आणि 40 आमदारांची सीट धोक्यात' ही बातमी म्हणजे सोशल मीडियावरील निव्वळ टाईमपास सुरू असून त्यामध्ये काहीही तथ्य नसल्याचं जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितलंय. एका खासगी कार्यक्रमासाठी ते आज डोंबिवलीत आले होते.

आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपने राज्यातल्या सर्व विधानसभा आणि लोकसभा मतदारसंघात हा सर्व्हे केला होता. त्यात लोकांना भाजपच्या आमदार आणि खासदारांंविषयी काही प्रश्न विचारण्यात आले होते. त्यात लोकांनी भाजप आमदार आणि खासदारांविषयी नाराजी व्यक्त केली. भाजप आणि शिवसेनेची युती झाली नाही तर आगामी विधानसभा निवडणुकीत कमळ फुलणार नाही अशीच शक्यता व्यक्त होतेय.

भाजपचे सोलापूरचे खासदार शरद बनसोडे, धुळ्याचे खासदार सुभाष भामरे आणि रक्षा खडसे यांचं काम योग्य नसल्याचं लोकांनी सांगतल्याची माहिती असून त्यांच्या जागा धोक्यात आहेत असंही म्हटलं जातंय. मात्र ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी या सर्व्हेत रक्षा खडसेंचं नाव नाही. त्यांची कामगिरी उत्तम असल्याचा अभिप्राय लोकांनी दिला असा खुलासा केलाय.

याबद्दल गिरीष महाजनांना पत्रकारांनी सवाल केला असता, राज्यातील भाजप सरकारने केलेल्या सर्व्हेमध्ये 8 खासदार आणि 40 आमदारांची सीट धोक्यात असल्याचे वृत्त चुकीचे आहे. हा म्हणजे सोशल मीडियावर चाललेला निव्वळ टाईमपास असून इच्छुक उमेदवारांकडून ते जाणूनबुजून पसरवले जात असल्याचं महाजन म्हणाले.

राष्ट्रवादीचा लोडशेडिंगचा आरोप फेटाळला

इतर राज्यातील निवडणुकांमुळे महाराष्ट्राच्या वाट्याचा कोळसा परराज्याना दिला जात असल्याने महाराष्ट्रात लोडशेडिंग सुरू असल्याचा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केलेला आरोपही त्यांनी फेटाळून लावला.

सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये अख्ख्या देशात विजेची मागणी वाढते. त्यामुळे कोळशाचा तुटवडा जाणवू लागला आहे. केंद्राकडून कोळसा यायला काहीसा विलंब होत असला तरी ही येत्या १० - १२ दिवसात ही समस्या दूर होईल असा दावाही जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी यावेळी केला.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours