मुंबई: ‘50 पैसे घालवून एक फोन केला असता तर अवनी वाघीण प्रकरणातील सगळी माहिती मिळाली असती,’ असा खोचक टोला लगावत वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी भाजप नेत्या आणि केंद्रीय मंत्री मनेका गांधी यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
अवनी वाघिणीला गोळ्या घालून ठार केल्यानंतर राज्य सरकारवर चहूबाजूंनी मोठी टीका होत आहे. या टीकेला सुधीर मुनगंटीवार यांनी पत्रकार परिषद घेऊन उत्तर दिलं आहे.
‘अवनी वाघीण प्रकरणात राज्य सरकारवर होत असलेली टीका ही केवळ अज्ञानातून होत आहे. सुप्रीम कोर्टाने याबाबत वाघिणीला कैद करा किंवा ठार करा असा आदेश दिला होता. त्यानंतर राज्य सरकारने ही कारवाई केली,’ असं स्पष्टीकरण सुधीर मुनगंटीवार यांनी दिलं आहे.
मनेका गांधी काय म्हणाल्या होत्या?
चंद्रपुरातील अवनी ही वाघीण नरभक्षक आहे, असं सांगून या वाघिणीला ठार केल्यानंतर भाजप नेत्या आणि केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री मनेका गांधी यांनीही संताप व्यक्त केला. ‘या प्रकरणी मी राजकीय आणि कायदेशीर कारवाईचा विचार करत आहे,’ असंही मनेका गांधी यांनी ट्विट करत म्हटलं.
‘वाघिणीची हत्या केल्याने मी खूप दु:खी झाली आहे. चंद्रपुरात शहाफत अली खान यानं आतापर्यंत 3 वाघ, 10 बिबट्या, अनेक हत्ती आणि जवळपास 300 रानडुकरांची हत्या केली आहे. अशा माणसाला तुम्ही अमानवी कृत्य करण्यासाठी कसं काय नेमू शकता,’ असा सवाल राज्य सरकारला विचारत मनेका गांधी यांनी ट्विटरवरून आपला संताप व्यक्त केला.
या क्रूर हत्यने दोन बछड्यांना अनाथ केलं आहे, असं म्हणत त्यांनी या प्रकरणाची भीषणता अधोरेखित केली. मनेका गांधी यांनी याप्रकरणी आक्रमक भूमिका घेत भाजपला घरचा आहेर दिला होता.
वनविभागाने या ऑपरेशनबद्दल अजिबात पारदर्शकता ठेवली नाही, कोट्यवधी रुपये वाया गेले, असाही आरोप वन्यप्रेमींनी केलाय. तर शवविच्छेदनाचा अहवाल प्राप्त होताच यातील उणीवा सर्वांसमोर येतील. पण या मोहिमेसंदर्भातली सर्व माहिती पुढे यावी यासाठी फारेंसिक अहवालसु्द्धा मागवावा, अशी मागणी वन्यजीव प्रेमींनी केलीय.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours