यवतमाळ, 06 डिसेंबर : अवनी वाघिणीला गोळ्या घालताना शिकारी असगर अली खान याने 3 कायद्यांचे उल्लंघन केले असल्याचे ताशेरे राष्ट्रीय व्याघ्र संरक्षण प्राधिकरणाने आपल्या रिपोर्टमध्ये ओढले आहेत. यवतमाळच्या राळेगाव जंगलातील कथित नरभक्षक वाघिण टीवन अवनीला वनविभागाच्या बचाव पथकातील सदस्य असगर अली खान याने गोळ्या घातल्या होत्या.

भारतीय शस्त्रास्त्र कायदा INDIAN arms act 1958 च्या 3(1) , इंडियन व्हेटरनरी काउंसिल एक्ट 1984, वन्यजीव (रक्षक ) कायदा 1972 आणि राष्ट्रीय व्याघ्र संरक्षण प्राधिकरणाच्या Standard Operative Procedure (SOP) चा भंग झाल्याचं या रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं आहे. अवनीला १ नोव्हेंबरच्या रात्री गोळ्या घातल्यानंतर यासंदर्भात चौकशी करण्यासाठी राष्ट्रीय व्याघ्र संरक्षण प्राधिकरणाने दोन सदस्यीय समती स्थापन केली होती.

दरम्यान, अवनी वाघिणीला मारण्यासाठी असगर अली खानने अवैध बंदूक वापरल्याचंही या रिपोर्टमध्ये समोर आलं आहे. अवनीला मारण्यासाठी वापरलेली बंदूक ही अजगरच्या मालकीची होती. ती त्याचा मुलगा शहाफत अलीने वापरल्याचं या रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं आहे.

हा रिपोर्ट राज्याचे मुख्यसचिव दिनेश कुमार जैन आणि राज्याचे प्रधान मुख्य वनसंरक्षक ए के मिश्रा यांना सादर करण्यात आला आहे. यवतमाळ जिल्ह्यातील राळेगावच्या जंगल परिसरात 13 लोकांचा जीव घेणाऱ्या टी-1 अर्थात अवनी या नरभक्षक वाघिणीला वनविभागाच्या रेस्क्यू टीमनं ठार केलं. पण, अवनीला ठार मारणं म्हणजे थंड डोक्यानं योजनबद्धरित्या तिचा केलेला खून आहे, असा थेट आरोप वन्यजीवप्रेमींनी केलाय. वनविभागाने या ऑपरेशनबद्दल अजिबात पारदर्शकता ठेवली नाही, कोट्यवधी रुपये वाया गेले, असाही आरोप वन्यप्रेमींनी केला होता.

तर शवविच्छेदनाचा अहवाल प्राप्त होताच यातील उणीवा सर्वांसमोर येतील. पण या मोहिमेसंदर्भातली सर्व माहिती पुढे यावी यासाठी फॉरेंसिक अहवालसु्द्धा मागवावा, अशी मागणी वन्यजीव प्रेमींनी केली होती. अवनीचा शोध सुरू असताना ती शोध पथकाला दिसली. दिसताक्षणी तिला वन विभागाच्या पथकाने जेरबंद करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यावेळी तिनं पथकाच्या दिशेनं चाल केली.

ती दिसताच शार्प शूटर अजगर अलीनं तिच्यावर गोळ्या झाडल्या. त्यात तिचा जागीच मृत्यू झाला.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours