नांदेड, 7 जानेवारी : महाराष्ट्र दौऱ्यावर असलेले भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी आपले उर्वरित कार्यक्रम अचानक रद्द केले आहेत. अमित शहा नांदेड विमानतळावरून दिल्लीला रवाना झाले आहेत. शहांनी ऐनवेळी आपले कार्यक्रम रद्द का केले, याबाबतची माहिती अद्यापपर्यंत मिळू शकलेली नाही.
महाराष्ट्र दौऱ्यावर असलेले अमित शहा हे नांदेडमधील एका गुरूद्वाऱ्याला भेट देणार होते. तसंच स्थानिक कार्यकर्त्यांशी संवादही साधणार होते. पण सर्व कार्यक्रम रद्द करत त्यांनी दिल्ली गाठली आहे.
दरम्यान, रविवारी लातूरमध्ये झालेल्या कार्यक्रमात अमित शहा यांनी आक्रमक भाषण करत मित्रपक्ष शिवसेनेवर निशाणा साधला. त्यानंतर शिवसेनेनंही भाजपला जोरदार प्रत्युत्तर दिलं.
काय म्हणाले होते अमित शहा?
भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी केलेल्या वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. राज्यात युती झाली तर ठिक, नाहीतर विरोधियोंको 'पटक' देंगे असा इशारा त्यांनी दिलाय. शहांचा हा इशारा नेमका कुणाला आहे यावर आता चर्चा सुरू झालीय. कार्यकर्त्यांनी प्रत्येक बुथ कसं जिंकता येईल ते बघावं असं आवाहनही त्यांनी कार्यकर्त्यांनी केलं. लातूर इथं पक्ष कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours