गेल्या महिनाभरापासून नानाभाऊ पटोले यांच्या निवडणूक  कॅम्पेनसाठी मी नागपूर मध्ये आहे.नानाभाऊ माझे मित्र आहेत.त्यांच्या विजयात खारीचा वाटा उचलावा म्हणून मी आलोय.एका सजग,तटस्थ पत्रकाराची जी समतोल भूमिका असते ,तिचं इथेही बजावतोय.एक पत्रकार म्हणून या मतदारसंघात मला जे दिसलं,जाणवलं तेच इथं मांडतोय.
मार्चच्या पहिल्या आठवड्यात मी नागपूरला आलो.तेव्हाच्या आणि आताच्या राजकीय वातावरणात जमिन-अस्मानचा फरक आहे. गेल्या १५दिवसांत नागपूरच्या सहाही विधानसभा मतदारसंघातील नानाभाऊ पटोले यांच्या पदयात्रात मी सहभागी झालो.अंगातून घामाच्या धारा निघत असतानाही,मी सोबत चालत राहिलो. त्यामुळे अगदी तळागाळातील वास्तव तटस्थपणे  टिपता आलं. मतदारांशी थेट बोलता आलं. या पदयात्रांतील सामान्य लोकांशी चर्चा करताना,मला सतत १९९५च्या लातूर विधानसभा मतदारसंघातील निवडणूक प्रचाराच्या वातावरणाची आठवण होत होती.महाराष्ट्राचे तत्कालीन लोकप्रिय नेते, मंत्री विलासराव देशमुख विरूध्द शिवाजी पाटील कव्हेकर अशी ती लढत होती.तेव्हाही मी असाच मतदारांमध्ये फिरत होतो.लोकांचा  सगळा मुड
लक्षात घेऊन, विलासरावांच्या पराभवाचं भाकीत मी पहिल्यांदा केलं.पहिल्या टप्प्यात एक-दोन पत्रकारचं माझ्याशी सहमत होते.नंतर सगळेजण या मताचे पुरस्कर्ते बनले.निकाल तसाच लागला.नागपूरमधील बहुतांश पत्रकार माझ्या या दाव्याशी  सहमत होणार नाहीत.पण सामान्य मतदार माझ्या मताशी सहमत आहेत.आज मतदानाला केवळ तीन दिवस उरले असताना,मी स्पष्ट अंदाज व्यक्त करतोय,या निवडणुकीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे पराभूत होणार.हा अंदाज विविध स्तरांतील शेकडो लोकांच्या मुलाखतींवर,लोकांच्या प्रतिसादावर आधारित आहे.
गडकरी यांचा पराभव शक्य नाही,असा दावा करणारे लोक त्यांनी केलेल्या विकासकामांची भली मोठी यादी देतात.या यादीतील बरेच प्रकल्प सुरूच झालेले नाहीत,याचीही त्यांना माहिती नसते.ते ज्याला विकास म्हणतात,त्याबाबत बहुसंख्य जनतेत मोठी खदखद आहे.उच्च मध्यमवर्गीय म्हणून ओळखला जाणारा वर्ग सोडला तर, मेट्रो प्रकल्प जनतेच्या पचनी पडलेला नाही.दहा हजार कोटी रुपये खर्चाच्या या प्रकल्पाची गरज होती का?याच्यामुळं खरचं लोकांची सोय होणार का?ठेकेदारांच्या फायद्यासाठी प्रकल्प राबविला जातोय की जनतेच्या?हे प्रश्न लोक गांभीर्याने विचारत आहेत.कारण मेट्रोमुळं दळणवळणाचा प्रश्न सुटणार नाही. दरमाणसी सर्वात जास्त दुचाकी असलेलं शहर,ही नागपूरची ओळख आहे.  केवळ दुचाकीला प्राधान्य देणारे नागपूरकर,गैरसोयीची मेट्रो स्विकारतील का?यावर प्रश्नचिन्ह आहेच.मेट्रोचं काम संपायला आणखी किती वर्षे लागतील माहिती नाही.पण २०१६ पासूनच मेट्रोचा टॅक्स नागपूरकरांच्या डोक्यावर बसलाय.सिमेंट रोडबाबतही लोकांच्या तीव्र प्रतिक्रिया आहेत.आपल्या मित्रांच्या सिमेंट कंपन्यांचा फायदा व्हावा म्हणून,गडकरींनी चांगले डांबरी रोड फोडून सिमेंट रोड केल्याचा उघड आरोप होतोय. या रस्त्यांना तडे जाताहेत,याच्यामुळे शहराच्या तापमानात तीन डिग्रीची वाढ झालीय,हे दुष्परिणाम दिसत आहेतच.या दोन्ही गोष्टींची गरज बहुसंख्य लोकांना वाटत नाही.दहा हजार कोटींचा आकडा सांगितला की,लोक म्हणतात,हजार कोटी तर मंत्र्याच्या खिशात गेले.या विकासामुळे आमचा काय फायदा झाला? या प्रश्नाचं समर्पक उत्तर  कोणाकडं नाही.सिमेंट रोडच्या उंचीमुळे गतवर्षी पावसाळ्यात हजारो घरात पाणी शिरलं,अनेक इमारती खचल्या.त्यांचं काय?असा प्रश्न लोक थेट विचारताहेत.येत्या पावसाळ्यात यापेक्षा अधिक गंभीर परिस्थिती निर्माण होऊ शकते,असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.यावर उत्तर काय?हे गडकरींनी सांगावं असं लोकांचं म्हणणं आहे.जम्मू आनंद यांच्यासारखा लढावू कामगार नेता तर,हा कसला विकास पुरूष,हा तर विनाश पुरूष, म्हणून गडकरींवर घणाघाती टीका करतोय.शहरात चालू असलेल्या या कामांमुळे , यापूर्वी कधीच न जाणवलेली वाहतूक कोंडीची समस्या ठिकठिकाणी जाणवतेय.या विकास कामांसाठी शहरातील १२००पेक्षा अधिक परिपूर्ण वाढ झालेली झाडं तोडण्यात आलीत. ही  वृक्ष तोड अद्याप सुरूच आहे.त्याबद्दल जनतेत आक्रोश आहे.नागपूर महापालिका गेल्या १३वर्षांपासून भाजपाच्या ताब्यात आहे.ही बाब गडकरींसाठी नुकसानीची ठरली आहे. पाणी,कचरा,वीजेचं खाजगीकरण,मालमत्ताकरात झालेली चुकीची वाढ असे अनेक मुद्दे भाजपा विरोधी जनमत बनण्यास कारणीभूत ठरले आहेत.हे सगळे निर्णय गडकरींच्या संमतीनेच झालेत.या खाजगी कंपन्याही  गडकरी यांच्या मित्रांच्या असल्याचा आरोप आहे. जनतेवर अव्वाच्या सव्वा कर लादूनही अनेक भागातील लोकांना पुरेसं पाणी मिळत नाही.कचरा उचलला जात नाही.त्यामुळं लोक भाजपावर चिडून आहेत.
गडकरींचा सोशल इंजिनिअरिंगचा मुखवटाही गळून पडलाय.गडकरींच्या विकासाचे लाभधारक कोण?असा प्रश्न केला की, दुर्दैवाने एकाच जातीची जास्तीत जास्त नावं समोर येतात. ही नावंच सगळं काही सांगून जातात.त्यांचा सर्वधर्मसमभावाचा,
सर्वसमावेशकतेचा  मुखवटा गळून पडतो.गडकरींच्या या लाभधारकांबद्दल लोकांच्या मनात तीव्र असंतोष आहे.त्यांची सामान्य माणसांसोबतची वागणूक चांगली नाही.
मुळात विकासाचं हे भव्यदिव्य मॉडेल लोकांना आवडलेलं नाही.मिहानच्या माध्यमातून  ५०हजार तरूणांना रोजगार देण्याचं  आश्वासन त्यांनी दिलं.प्रत्यक्षात हजारभर नोकऱ्याही निर्माण झाल्या नाहीत.नवे उद्योग सुरू झाले नाहीत.त्यावरून तरूण वर्गात प्रचंड रोष आहे.आयटी केलेल्या तरूणांना आजही नोकरीसाठी पुणे,हैद्राबाद,बंगलोरला जावं लागतं,याची चीड आणि खंत लोकांमध्ये आहे.मिहान, हे गडकरींच्या अपयशाचं प्रतिक म्हणावं लागेल.इथेनॉल वर चालणारी बस सेवा बंद पडणं,स्मार्ट सिटी,नाग नदीची स्वच्छता मोहिम व त्यातून जलपर्यटन अशा अयशस्वी योजनांची मोठी यादी गडकरींच्या नावावर  आहे.शहरात वाहतुकीसाठी पुरेशा बस नाहीत, वाहतूक व्यवस्था चांगली नाही.स्वच्छतागृह  नाहीत,बागांची अवस्था चांगली नाही....ही यादी बरीच मोठी आहे.मागील आश्वासनांची पूर्तता झालेली नसताना,आज त्यांनी नवा जाहिरनामा प्रसिध्द केलाय.लोक त्यावर विश्र्वास ठेवणार नाहीत.
नागपूरात यावेळी, विकास नेमका कशाला म्हणायचं?हाच मुद्दा ऐरणीवर आलाय.गडकरींचा जनसंपर्क हा पत्रकार, शासकीय अधिकारी आणि पक्षाचे नेते,कार्यकर्ते यांच्यापुरताच मर्यादित आहे.गडकरींना प्रत्यक्ष भेटलात का?या प्रश्नाचं होकारार्थी उत्तर मला नागपूरच्या गल्ल्यांमध्ये मिळालं नाही.त्यांना टी.व्ही.वर आणि वृत्तपत्रातूनच पाहिलं,असं उत्तर लोक उपरोधानं देतात. माध्यमांतील अतिप्रसिध्दीचा नकारात्मक परिणाम झालाय.वृत्तपत्र वाचून आणि टी.व्ही.बघून मत बनण्याचे दिवस कधीच संपलेत,हे भाजपाईंच्या अद्याप लक्षात आलेलं दिसत नाही.गडकरींच्या भ्रष्टाचाराची ,त्यांच्या मुलांच्या नावावरील कंपन्यांच्या उलाढालींची,कर्जप्रकरणांची वृत्तपत्रातून वा माध्यमांतून फारशी चर्चा झालेली नसताना सुध्दा,त्यांनी प्रचंड पैसा कमावलाय,अशीच जनभावना आहे. वाड्यावरचे नेते,ठेकेदारांचे,कंपन्यांचे हितकर्ते अशीच त्यांची प्रतिमा आहे.स्कुटरवर फिरणारे गडकरी ते आजचे विमानाने फिरणारे करोडपती गडकरी हा प्रवास नागपूरकरांनी पाहिलाय.त्यांच्या बांधकामाधिन असलेल्या आलिशान बंगल्याच्या सुरस कथा जनतेत चर्चिल्या जात आहेत.'विकास'म्हटलं की,या बाबींची चर्चा होणं अटळ आहे.
नागपूरमधील कायदा-सुव्यवस्थेची परिस्थिती हा नेहमीच टीकेचा विषय राहिला आहे.त्याबद्दल गडकरीनी कायम मौन बाळगलयं.
सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे, यावेळी केंद्र व राज्य सरकारच्या कारभाराबाबत जनतेत चीड आहे.नरेंद्र मोदी  यांचा करिष्मा उतरलाय. फेकू हे नाव लोकप्रिय झालयं.चौकीदार चोर आहे, असं लोकांना वाटतयं.या सरकारने घोषणा केल्या पण आश्वासनपूर्ती केली नाही,याचा लोकांमध्ये राग आहे.हा फटका गडकरींना  भाजप उमेदवार म्हणून बसतोय.
नागपूर हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं केंद्र असलं तरी, कॉन्ग्रेस चा हा गड आहे.मुळात इथंली भाजपा म्हणजे कॉन्ग्रेसच आहे.इथं संधी मिळाली नाही म्हणून बहुतेकजण भाजपातून आमदार, नगरसेवक बनलेत .मात्र बहुतांश मतदारांची कॉन्ग्रेसशी जुळलेली नाळ तुटलेली नाही.गटातटात विभागलेली कॉन्ग्रेस, नानाभाऊ पटोले यांच्यामुळं एकत्र झालीय.सगळ्यांच्याच राजकीय अस्तित्वाचा प्रश्न असल्याने, अपवाद वगळता बहुतेकजण नानाभाऊंच्या प्रचारात उतरलेत.एखाद्या नेत्याने विरोध केला तरी,लोक त्याचं ऐकतील अशी स्थिती नाही.पटोले यांच्यावर,बाहेरचे उमेदवार अशी टीका करण्याचा प्रयत्न झाला.पण तो टिकला नाही.गेल्या वीस वर्षांपासून त्यांचे नागपूर मधील रहाटे कॉलनीत वास्तव्य आहे.त्यांचे नाव नागपूरच्या मतदार यादीत आहे.ओबीसी व शेतकऱ्यांचा लढवय्या नेता म्हणून त्यांचे नाव सगळ्यांना माहित आहे.मोदींच्या हुकूमशाही वृत्तीविरोधात बंड करून,खासदारकीचा राजीनामा दिल्याने त्यांचे नाव घराघरात पोचले आहे.स्वच्छ प्रतिमा आणि जनतेच्या प्रश्नांसाठी लढणारा नेता,ही त्यांची  सगळ्यात मोठी जमेची बाजू आहे.त्यांच्यावर व्यक्तीगत टीका करायला मुद्दाच नाही.नागपूरच्या सगळ्या विधानसभा मतदारसंघात दरदिवशी भर उन्हात सहा-सात तासांच्या पदयात्रा काढून,नवखा ही प्रतिमा त्यांनी पुसून काढलीय.एक उमेदवार अशा पध्दतीनं आपल्याला थेट भेटतोय,यांचं लोकांना मोठं कौतुक आहे.या पदयात्रांना मिळणारा प्रतिसाद अभूतपूर्व असाच आहे.ठिकठिकाणी ओवाळणी, पुष्पहार आणि पुष्पवृष्टीनं होणारं स्वागत अचंबित करणारं आहे.त्यातही नाना पटोले यांचं व्यक्तिमत्त्व जादूई आहे.त्यांचा साधेपणा,सहजता कोणालाही भावते. त्यांना भेटणारा माणूस आपोआप त्यांचा होऊन जातो.
त्यांच्या भाषणात कुठेच जातीचं आवाहन नाही.मात्र संघभूमी विरूध्द दीक्षाभूमी हा मुद्दा ते प्रभावीपणे मांडत आहेत.प्रसारमाध्यमं नाना पटोले मतांसाठी डीएमके ची बांधणी करीत असल्याची नकारात्मक  चर्चा घडवून आणत आहेत.ही बाब त्यांना फायद्याची ठरतेय.दलीत, मुस्लिम आणि कुणबी,म्हणजे डीएमके.यातील बहुसंख्य दलीत यावेळी कॉन्ग्रेसच्या बाजूने आहेतच.मुस्लिम मतदान एकगठ्ठा पटोलेना मिळेल.नानाभाऊंच्या आजपर्यंतच्या राजकारणाचा केंद्रबिंदू ओबीसी, शेतकरी हाच राहिला आहे.त्यांनी आजपर्यंत  एका जातीचं असं  राजकारण कधीही केलेलं नाही.राजकारण केलं ते ओबीसींचं.त्यामुळे केवळ कुणबी नाही तर,माळी,कोळी,कोष्टी,तेली, पिंजारी असा सगळा 
ओबीसी त्यांच्या बाजूने उभा आहे.तो पैशाने अथवा इतर कोणत्याही कारणाने फुटणार नाही.याचे कारण या ओबीसींचे नानाभाऊंशी भावनिक नाते आहे.ते त्यांच्या हक्कासाठी सतत संघर्ष करीत आले आहेत.सलग तीन-चार निवडणुकांतील  फसवणुकीमुळे हलबा समाज भाजपाला धडा शिकवायला सज्ज आहे.ख्रिश्चन समाजही एकजुटीने कॉन्ग्रेसच्या बाजूने आहे.कायम भाजपाच्या पाठिशी उभा राहणारा व्यापारी वर्ग यावेळी कॉन्ग्रेसला पाठिंबा देतोय.रिक्षावाले,हातगाडीवाले,हातावर पोट असणारे सगळे लोक भाजपाच्या विरोधात आहेत.ते उघडपणे म्हणताहेत,पैसे गडकरींचे,मत नानाला.
नाना पटोले म्हणतात तशी,ही धनशक्ती विरूध्द जनशक्तीची लढाई आहे.गडकरींकडं सगळं काही आहे.त्यांच्याकडंही गर्दी आहे.पाण्यासारखा पैसा खर्च होतोय.दररोज जेवणावळ्या सुरू आहेत.ज्याला जे पाहिजे ते दिलं जातयं. पण कुठेच उत्साह नाही.मतदार आपल्या विरोधात गेले आहेत,याची जाणीव चौकीदारांना झालीय.
याउलट स्थिती नाना पटोले यांची आहे. यंत्रणा उभी करण्यासाठीचा पैसा नाही.विकत घेणं दूरचं , किमान काही जणांना खूष करण्याइतकेही पैसे नाहीत.पण सर्व थरांतील लोक उत्स्फूर्तपणे त्यांच्या सोबत आहेत.तेच सांगतात,नाना निवडूण येणारच.मतदारचं जेव्हा निवडणूक आपल्या हातात घेतात,तेव्हा तिथं कसलाच फंडा कामाला येत नाही.नाना पटोले यांची ही निवडणूक लोकांनीच हातात घेतलीय.त्यामुळं जात,धर्म,हिंदूत्व असा कुठलाच मुद्दा इथं टिकणार नाही.पैसा,दारू आणि अफवाही काम करणार नाहीत.कारण लोकांची मतं पक्की बनलीत.ही लढाई गडकरी विरूद्ध पटोले अशी थेट आहे.इतर कुठलाच उमेदवार या निवडणुकीत दखलपात्र नाही.मतांचं विभाजन करण्यासाठी कोण कोणाला उभं केलंय,हे लोकच सांगतात.
नागपूरमधील जनतेने गडकरींना पराभूत करून,नाना पटोले यांना विजयी करण्याचा निर्धार केलाय. नाना पटोले पुन्हा एकदा इतिहास घडवणार ही काळ्या दगडावरची रेघ आहे.प्रश्न फक्त एवढाच आहे, गडकरी किती मताधिक्याने पराभूत होणार.


Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours