नवी दिल्ली, 27 मे: लोकसभा निवडणुकीत ऐतिहासिक विजय मिळवल्यानंतर आता नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील नव्या सरकारचा शपथवधी आणि मंत्रिमंडळाच्या स्थापनेला वेग आला आहे. 2014मध्ये राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA)चा भाग नसलेले जेडीयू आणि अण्णाद्रमुक हे दोन नवे पक्ष यावेळी मोदी सरकारमध्ये असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. याशिवाय मोदींच्या मंत्रिमंडळात पश्चिम बंगाल आणि तेलंगणा या राज्यातून नवे चेहेरे दिसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. 
जेडीयूमधील एका नेत्याने दिलेल्या माहितीनुसार यावेळी बिहारमधून पक्षाला एक कॅबिनेट मंत्रिपद आणि एक राज्यमंत्रीपद मिळण्याची शक्यता आहे. नरेंद्र मोदींनी राष्ट्रपतींची भेट घेऊन सत्तास्थापनेचा दावा केला आहे. येत्या 30 तारखेला म्हणजे गुरुवारी मोदी पंतप्रधान म्हणून त्यांच्या दुसऱ्या कार्यकाळाला सुरुवात करतील. अर्थात शपथविधी सोहळ्याची अधिकृत तारिख आणि वेळ अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. तसेच नव्या मंत्रिमंडळात कोणते नवे चेहेरे असतील हे देखील सांगण्यात आलेले नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मोदींच्या पहिल्या कार्यकाळातील जवळ जवळ सर्व मंत्र्यांना पुन्हा संधी मिळण्याची शक्यता आहे. 
गेल्या मंत्रिमंडळात अर्थ खाते सांभाळणारे अरुण जेटली यांची प्रकृती बिघडल्याने ते यावेळी मोदींच्या मंत्रिमंडळात असतील की नाही याबद्दल शंका व्यक्त केली जात आहे. जेटलींच्या जवळच्या लोकांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. जेटली यांच्या प्रकृती संदर्भात अफवांवर विश्वास ठेवू नका असे आवाहन पक्षाने देखील केले आहे. 
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours