मुंबई, 3 मे: लोकसभा निवडणुकीनंतर पंतप्रधान कोण होणार यावर अनेक राजकीय नेते अंदाज व्यक्त करत आहेत. काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ममता बॅनर्जी, चंद्राबाबू नायडू आणि मायावती या पंतप्रधानपदाच्या दावेदार ठरू शकतात, असं म्हटलं होतं. पवारांच्या या वक्तव्यावर संपूर्ण देशात चर्चा सुरू झाली होती. आता वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा डॉ.प्रकाश आंबेडकर यांनीही पंतप्रधानपदाबाबत मोठं वक्तव्य केलं आहे.
'देशाचा आगामी पंतप्रधान हा काँग्रेस किंवा भाजपचा नसेल. त्यामुळे राहुल गांधी किंवा नरेंद्र मोदी पंतप्रधान होण्याची शक्यता नाही. निवडणुकीनंतर माजी पंतप्रधान एच.डी. देवेगौडा हे पंतप्रधानपदाचे प्रबळ दावेदार ठरू शकतात,' असा अंदाज प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केला आहे.
'पवारांना पंतप्रधानपदासाठी लायक मानत नाही'
'शरद पवारांना मी पंतप्रधानपदाच्या लायक मानत नाही. ममता बॅनर्जी, चंद्राबाबू नायडू आणि केसीआर हे देखील कधीच पंतप्रधान होणार नाहीत,' असं विधान आंबेडकरांनी केलं आहे. 
'भाजपच्या 50 जागा कमी होणार'
यंदाच्या निकालात भाजपला 148 ते 200 जागा मिळतील असा अंदाज आंबेडकरांनी व्यक्त केला. तर काँग्रेसला 100पर्यंत जागा मिळतील असे आंबेडकर म्हणाले.
काय म्हणाले होते पवार?
एका राष्ट्रीय वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत पवारांनी 'ममता बॅनर्जी, एन. चंद्राबाबू नायडू, मायावती आणि राहुल गांधी हे पंतप्रधानपदाचे चांगले दावेदार ठरू शकतात, असे सांगितले होते. यामध्ये पवारांनी राहुल गांधींपेक्षा इतर तीन नावे पंतप्रधानपदासाठी अधिक प्रभावी ठरु शकतात, असे म्हटले होते. 
मुलाखतीत शरद पवार यांनी निवडणुकीनंतर तयार होणाऱ्या परिस्थितीवरही भाष्य केले होते. ते म्हणाले की, निवडणूक निकालानंतर आम्ही एका समान अजेंड्यावर एकत्र येऊन देशाला नवा पर्याय देण्याचा प्रयत्न करू. एनडीएतीलही काही पक्ष आघाडीत येतील, याबाबतचे संकेत शरद पवारांनी दिले आहेत.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours