मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा यांच्यावर गेले काही वर्ष सातत्याने कठोर टीका करणाऱ्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केंद्र सरकारचं कौतुक केलंय. गेल्या काही काळातील केंद्र सरकारचा उत्तम निर्णय! असं ट्विट राज ठाकरेंनी केलंय. लोकसभा निवडणुकीच्या काळात राज ठाकरे यांनी मोदी-शहांवर कडाडून हल्ला केला होता. या दोघांनी देशाला खड्ड्यात घातलंय. हे दोघं राजकारणातून हद्दपार झाल्याशीवाय देश सुधरणार नाही अशी जहरी टीका त्यांनी केली होती. मात्र कलम 370 हटविण्याचा निर्णय राज ठाकरेंना आवडलेला दिसतोय. त्यांच्या या ट्विटची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे.
गृहमंत्री अमित शहा यांनी आज राज्यसभेत हा निर्णय जाहीर करताच देशभर जोरदार चर्चा सुरू झाली. कायम मोदी सरकारवर टीका करणाऱ्या अनेकांनी या निर्णयाचं स्वागत केल्याचं सोशल मीडियावरूनही स्पष्ट झालं. आप, बसपा, बीजेडी, या विरोधी पक्षांनी सरकारच्या या निर्णयाचं स्वागत केलंय तर भाजपचा मित्रपक्ष असलेल्या जेडीयू ने निर्णयाला विरोध केला.
लोकसभा निवडणुकीतल्या पराभवानंतर राज ठाकरे यांनी देशपातळीवर जाऊन मोदींच्या विरोधात मोट बांधण्याचा प्रयत्न केला. दिल्लीत जाऊन सोनिया गांधी यांची भेट घेतली आणि कोलकात्यात जाऊन ते ममता बॅनर्जींनाही भेटले. EVM विरोधात 21 ऑगस्टला मुंबईत सर्वपक्षीय मोर्चाही काढणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं होतं. त्यामुळे राज ठाकरे यांनी आज मोदी सरकराच्या केलेल्या कौतुकामुळे आश्चर्य व्यक्त होतंय.
असे होतील काश्मीरमध्ये बदल
केंद्राच्या या निर्णयामुळे राज्यात आता काही महत्त्वाचे बदल होणार आहेत. ते बदल असे आहेत, जम्मू आणि काश्मीरमधल्या नागरिकांचा दुहेरी नागरिकत्व संपणार. इतर राज्यांप्रमाणेच तेही भारताचे नागरिक होतील, आता देशातल्या इतर राज्यांमध्ये नागरिक जम्मू आणि काश्मीरमध्ये जमीन आणि संपत्ती घेऊ शकतील,  केंद्र सरकारच्या सर्व कायद्यांची आता जम्मू आणि काश्मीरमध्ये थेट अंमलबजावणी होईल. जम्मू आणि काश्मीरसाठी वेगळे कायदे करण्याची गरज राहणार नाही.  कलम 360 नुसार केंद्र सरकार आता जम्मू आणि काश्मीरमध्ये आर्थिक आणीबाणीची घोषणा करू शकते.

आत्तापर्यंत राज्याचा आणि केंद्राचा असे दोन राष्ट्रध्वज होते. आता मात्र फक्त तिरंगा हा एकच ध्वज असेल देशातल्या इतर राज्यांप्रमाणे जम्मू आणि काश्मीरमध्ये आता दर पाच वर्षांनी निवडणुका होती. आधी दर सहा वर्षांनी निवडणुका होत होत्या. राज्यातलं पोलीस दल आता केंद्राच्या अधिकारात येईल. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला आणि काश्मीर खोऱ्यात शाखा उघडता येतील. आता खोऱ्यातही हिंदू आमदार निवडून येऊ शकतील.

Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours