मुंबई :  राज्यात कोरोनाचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. मात्र कोरोनाबाधितांचे आकडे वाढत असले तरी महाराष्ट्रासाठी एक दिलासादायक गोष्ट आहे. काल, 21 एप्रिलपर्यंत झालेल्या एकूण कोरोना चाचण्यांपैकी जवळपास 94 टक्के चाचण्या निगेटिव्ह आल्या आहेत. सार्वजनिक आरोग्य खात्याच्या वैद्यकीय शिक्षण व आैषधी विभागाच्या अहवालातून ही बाब समोर आली आहे. राज्यात 9 मार्च रोजी राज्यात पहिला पॉझिटिव्ह रुग्ण आढळला होता. त्यानंतर रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. राज्यात कोरोना चाचण्यांचे प्रमाणही वाढले असून आता राज्यात दररोज 7 हजारपेक्षाही अधिक चाचण्या घेण्यात येत आहेत.

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या 96 हजार 369 नमुन्यांपैकी 89 हजार 561 जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोना करता निगेटिव्ह आले आहेत तर 6427 जण पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 1 लाख 14 हजार 398 लोक होम क्वारंटाईनमध्ये असून 8702 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.  मुंबई-पुण्यासह राज्यात रुग्णांची संख्या वाढत असताना या अहवालातील हे निष्कर्ष काहीसे दिलासादायक ठरले आहेत, अशी माहिती काल आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours