मुंबई, 07 एप्रिल : कोरोना व्हायरसमुळे जगभरात हाहाकार उडाला आहे. भारतातही कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्यामुळे चिंतेचं वातावरण आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण आढळून आहे. अशा या परिस्थितीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनावरून शिवसेनेनं आपले मुखपत्र असलेल्या 'सामना'तून सडकून टीका केली आहे.
पंतप्रधान मोदी यांनी रविवारी रात्री 9 वाजून 9 मिनिटांनी दिवे लावण्याचं आवाहन केलं होतं. परंतु, त्यांच्या या आवाहनानंतरही लोकांनी एकत्र जमून गोंधळ घातला होता. एवढंच नाहीतर भाजपचे आमदार तर मशाल घेऊन रस्त्यावर उतरले होते. त्यांच्या वर्तवणुकीवरुन सेनेनं आजच्या 'टाळ्या, थाळ्या आणि दिवे; अशाने युद्ध हरू' या  अग्रलेखातून भाजपवर हल्लाबोल केला आहे.
'पानिपतच्या युद्धात आपला पराभव झाला होता तो अफवा, नियोजनशून्यता यामुळे. कोरोना युद्धाची स्थिती ‘पानिपत’सारखी होऊ नये. जनतेचा सदाशिवराव भाऊ होऊ नये. हाती मशाली आहेत, त्यात स्वत:चेच कपडे जळू नये. पंतप्रधानांनी स्पष्ट सांगावे; जे सांगितले तेच घडावे. उलट वागणाऱ्यांना अद्दल घडवावी. फक्त `मरकज’वालेच नियम मोडतात असे नाही! मरकजवाल्यांवर कोरोना संक्रमणाचे खापर फोडणारे तरी शिस्तीचे कोणते दिवे पाजळत आहेत' असा टोला भाजपला लगावण्यात आला आहे.
'पंतप्रधानांनाच `उत्सवी’ वातावरण हवे'
कोरोनामुळे आज हजारो रुग्ण मृत्यूशी झुंज देत आहेत. काहींनी त्यांचे प्राणही गमावले आहेत. अशा वेळी परिस्थितीचे गांभीर्य न ओळखता लोक रस्त्यांवर घोळक्याने फिरतात, घोषणा देतात, फटाके फोडतात, आतिषबाजी करतात हा सगळाच प्रकार हास्यास्पद म्हणावा लागेल. पंतप्रधान नक्की काय सांगत आहेत ते समजून न घेता जनता अशी मनमानी करते. त्यास युद्ध म्हणता येणार नाही. हा सरळ सरळ आत्मघात आहे. पंतप्रधानांचा लोकांशी नीट संवाद होत नाही. शेवटचा अर्थ असा की, जे घडते आहे तसे `उत्सवी’ वातावरण पंतप्रधानांनाच हवे आहे, अशी टीकाही सेनेनं केली.
'अमेरिकेने थाळ्या, घंटा, शंख मागितले नाही'
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प हे सध्या चीनबाबत सगळ्यात जास्त शिवराळ भाषा वापरत आहेत, पण चीनला शिव्या देऊन त्यांना कोरोनावर मात करता आली नाही. न्यूयॉर्क राज्यात कोरोनाने हजारो बळी घेतले आहेत. महासत्ता अमेरिका हतबल आणि लाचार झाली आहे. ट्रम्प यांनी पंतप्रधान मोदींकडे कोरोनाशी लढण्यासाठी औषधे मागितली आहेत. ट्रम्प यांनी भारताकडे थाळ्या, घंटा, शंख, मेणबत्या किंवा पणत्या मागितल्या नाहीत हे आपल्याकडील उत्साही व उत्सवी प्रजेने समजून घेतले पाहिजे, असा टोलाही लगावण्यात आला.
'उद्धव ठाकरेंसारखा सेनापती हवा'
सोमवारी राज्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 830 च्या घरात पोहोचली. तसेच मुंबईतील कोरोनाबाधितांचा आकडा 490 झाला आहे. म्हणून लोकांनी शिस्त पाळायलाच हवी असे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे वारंवार सांगत आहेत.  ठाकरे हे लोकांना मदत कशी करता येईल यावर भर देत आहेत. वैद्यकीय सुविधा कशा वाढवता येतील यावर लक्ष ठेवून आहेत. लोकांशी सहज सरळ पद्धतीने, कोणताही गोंधळ उडणार नाही अशा रीतीने संवाद साधत आहेत.
जम्मू-कश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्सचे नेते ओमर अब्दुल्ला यांनीही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे कौतुक केले आहे. `कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री या नात्याने उद्धव ठाकरे जी परिस्थिती हाताळत आहेत ती खरच कौतुकास्पद आहे,’ असं ट्वीट ओमर यांनी केले आहे. कोरोनाशी जे युद्ध सुरू आहे त्या युद्धात लढण्यासाठी अशाच सेनापतीची गरज आहे, असं कौतुकही उद्धव ठाकरेंचं करण्यात आलं आहे.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours