नांदेड : लॉकडाऊनमुळे राज्यात अडकलेल्या लोकांना आपल्या मूळ गावी परतण्यासाठी शासनाने परवानगी दिली आहे. त्यानंतर नांदेडहून काही भाविक पंजाबमध्ये परतले होते. त्यापैकी 351 लोकांना कोरोनाची लागण झाल्याचं निष्पन्न झालं आहे. तर नांदेडमध्ये देखील कोरोनाचा आकडा अचानक वाढला आहे. नांदेडहून आलेल्या भाविकांमुळं पंजाबमध्ये कोरोना पसरला असल्याचं पंजाब सरकारनं म्हटलं आहे तर  नांदेडमध्ये पंजाबच्या चुकीमुळं कोरोना पसरला असल्याचा आरोप मंत्री अशोक चव्हाण यांनी केला आहे. यावरुन पंजाब आणि महाराष्ट्र सरकार आता आमने-सामने आलं आहे.

नांदेडमधून पंजाबमध्ये गेलेल्यांचे कोरोनाचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तसेच नांदेडमध्ये अचानक कोरोनाचे रुग्ण सापडल्यामुळं गुरुद्वारा, लंगर साहिब आणि संपूर्ण परिसर प्रशासनाने सील केला आहे.

पंजाबमध्ये वाढत्या कोरोना केसेसमुळं खळबळ उडाली आहे. नांदेडहून काही भाविक पंजाबमध्ये परतले होते. त्यापैकी 351 लोकांना कोरोनाची लागण झाल्याचं निष्पन्न झालं आहे. नांदेडहून आलेल्या भाविकांमुळं पंजाबमध्ये कोरोना पसरला असल्याचं पंजाब सरकारनं म्हटलं आहे. मात्र आता मंत्री अशोक चव्हाण यांनी पंजाबवरच नांदेडमध्ये कोरोना पसरवल्याचा आरोप केला आहे.

फेसबुक लाईव्हमध्ये अशोक चव्हाण यांनी म्हटलं आहे की, गेल्या आठवड्यापर्यंत एकही रुग्ण नांदेडमध्ये नव्हता मात्र आता हा आकडा 26 वर गेलाय. त्यामुळं काळजी घेण्याची गरज आहे. 26 पॉझिटिव्ह रुग्णांपैकी तीन रुग्ण वगळता बाकीचे 3 जण पंजाबहून आलेले वाहनचालक आहेत तर 20 जण गुरुद्वाराचे सेवेकरी आहेत. त्यामुळं या संक्रमणाचा स्त्रोत नांदेड शहर नसून हे बाहेरुन आलेले लोकं आहेत, हे प्रथमदर्शनी दिसून येतेय, असंही चव्हाण यांनी म्हटलंय.  या गुरुद्वारामधील बाबांनी स्पष्ट केले आहे की, भाविकांची नियमित तपासणी केली जात होती. या भाविकांना नांदेडमुळे लागण झालेली नाही.  या भाविकांना नांदेडमध्ये लागण झाली असती तर आम्ही तपासणी केली असती असं बाबांनी सांगितलं असल्य़ाचं देखील चव्हाण म्हणाले. पंजाबला गेलेले भाविक किंवा तिथून महाराष्ट्रात आलेले वाहनचालक यांना प्रवासात कोरोनाची लागण झाली असल्याची शक्यता नाकारता येत नाही, असं चव्हाण यांनी म्हटलंय.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours