महाराष्ट्राचं वन विभाग झोपा काढतंय का असा प्रश्न विचारल्यानंतर आश्चर्य वाटायला नको...कारण महाराष्ट्राचा लाडका वाघ जयनंतर आता त्याचा बछडा जयचंद बेपत्ता झालाय. गेल्या दोन महिन्यांपासून त्याचा काही ठावठिकाणा नाही. जयचंद बेपत्ता झाल्यानंतर व्याघ्र प्रेमी काळजीत पडले आहेत.
'जयचंद'नं सर्व प्राणीप्रेमींच्या जीवाला घोर लावलाय. भंडारा जिल्ह्यातल्या पवनी वनपरिक्षेत्रातून तो गेल्या दीड ते दोन महिन्यांपासून बेपत्ता आहे. जंगलात त्याच्या पाऊलखुणाही दिसत नाहीत. तो कुठे गेला, त्याचं काय झालं, याचा कोणताच थांगपत्ता नाहीय.
आशियातला सर्वात मोठा समजला जाणारा जय हा वाघ गेल्या दोनवर्षांपासून बेपत्ता आहे. उमरेडच्या अभयारण्यात राहणाऱ्या जयच्या कुटुंबाची वाताहत झाली. त्याच्या श्रीनिवास या एका बछड्याची शिकार झाली तर दुसरा बछडा जयचंदसुद्धा बेपत्ता झालाय.
वनविभाग मात्र अजूनही गप्पच आहे. एकीकडे वाघांची संख्या वाढल्याचे ढोल बडवले गेले. पण हा रुबाबदार प्राण्यावर त्याच्या अभरण्यातच जीव मुठीत घेऊन जगण्याची वेळ आलीय, हेच खरं...
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours