रायगड, 19 जून : रायगडमधील महड येथे पुजेतील जेवणातून ५० ते ६० जणांना विषबाधा झाल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेत तीन लहान मुलांचा मृत्यू झाला आहे. तर २५ जणांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर पनवेलमध्ये रुग्णालयात उपचार सुरु आहे.
खालापूर तालुक्यातील महड येथील माळी कुटुंबाच्या घरी सोमवारी वास्तूशांतीचा कार्यक्रम होता. पुजेनंतर सर्वांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. हा कार्यक्रम आटपून स्वगृही परतलेल्यांना रात्री उशिरा उलटी आणि मळमळण्याचा त्रास सुरु झाला.
५० ते ६० जणांना विषबाधा झाल्याचे वृत्त असून सुरुवातीला सर्वांना खोपोलीतील रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, तोपर्यंत ३ लहान मुलांचा मृत्यू झाला आहे. तर २५ जणांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पनवेलमधील रुग्णालयात हलवण्यात आले. या घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे.
दरम्यान, या जेवणातून विषबाधा होण्यामागचं नक्की कारण काय आहे याचा आता पोलीस तपास घेत आहेत. पण या संपूर्ण प्रकारामुळे परिसरात एकच खळबळ माजली आहे.
Post A Comment:
0 comments so far,add yours