गडचिरोली, ३१ ऑक्टोबर : गडचिरोली येथील महिला आणि बाल रूग्णालयात प्रसुती शस्त्रक्रियेदरम्यान बॅन्डेज पट्टी आणि कापूस पोटातच राहिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. पीडित मुलगी आणि तिच्या आईने मंगळवारी गडचिरोलीत घेतलेल्या पत्रकार परिषद ही आपबिती कथन केली.
गडचिरोली तालुक्यातील कनेरी (टोला) येथील लालनी नैताम यांची मुलगी कांता शर्मा हिला पहिल्या प्रसुतीसाठी गडचिरोलीच्या महिला आणि बाल रूग्णालयात १० ऑक्टोबरला सकाळी 8 वाजता दाखल करण्यात आलं. यावेळी येथे उपस्थित स्टाफ नर्सने प्रसुतीला वेळ असल्याचे सांगून तब्बल १२ तास तिच्याकडे दुर्लक्ष केलं. अखेर सायंकाळी 6 वाजता कांताला प्रसुतीसाठी शस्त्रक्रिया गृहात नेण्यात आलं. सायंकाळी 7.50 वाजता नैसर्गिक प्रसुती झाली आणि कांताची एका गोंडस मुलीला जन्म दिला.
मात्र, प्रसुतीनंतर तब्बल दोन तास कांताकडे दुर्लक्ष केलं गेलं आणि ९ वाजताच्या सुमारास तिच्यावर उपचार करण्यात आले. यावेळी मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होत असल्याने कांताच्या कुटुंबियांनी नर्सकडे विचारणा केली. यावेळी नर्सने उलट उत्तर देत ''तुम्हाला जमते तर तुम्हीच करा'', असे त्यांना बजावले आणि ''घरीच प्रसुती का केली नाही'', असे बोलून त्यांना अपमानित केलं.
12 ऑक्टोबरला कांताला रूग्णालयातून सुट्टी झाली. घरी आल्यानंतर तीला चालताना आणि बसताना अतोनात वेदना व्हायला लागल्या. अखेरिस 27 ऑक्टोबर रोजी ती स्वच्छतागृहात गेली असता, बॅन्डेज पट्टी आणि कापूस बाहेर पडले. प्रसुतीनंतर करण्यात आलेल्या उपचारादरम्यान या गोष्टी पोटातच राहिल्याचा धक्कादायक प्रकार यामुळे लक्षात आला. यानंतर गावातल्या आरोग्य सेविका सुनंदा सुपारे यांच्याकडे कांता आणि तिच्या कुटुंबियांनी धाव घेतली. आरोग्य सेविकेने कांताला रूग्णालयात दाखल होण्याचा सल्ला न देता, आणखी शिल्लक असलेला कापूस आणि बॅन्डेज पट्टी काढल बाहेर काढली व काही औषधं लिहून दिली. त्यानंतर अजुनही चालता-बोलताना आणि बसता-उठताना असह्य त्रास सहन करावा लागत असल्याचे कांताने मंगळवारी तिच्या आईसमवेत घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.
Post A Comment:
0 comments so far,add yours