मुंबई: प्लास्टिक बंदीच्या विरोधात पर्यावरण खात्याने आता कडक पावलं उचललीये. आता प्लास्टिक पिशवी दुकानात सापडली तर दुकानाचा परवानाच रद्द करण्यात येईल अशी माहिती पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी दिली.
आज प्लास्टिक बंदी संदर्भात मह्त्वाची बैठक पार पडली. विशेष म्हणजे या बैठकीला शिवसेनेच्या युवासेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे उपस्थित होते.
प्लास्टिक बंदी झाल्यानंतर आज सर्व अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेण्यात आलीये. आतापर्यंत राज्य सरकार ६० टक्के प्लास्टिक बंदीची अंमलबजावणी यशस्वीपणे पार पाडलीये. आता यापुढे दुकानदारांकडून प्रतिज्ञापत्र लिहून घेणार आहोत. दुकानदारांकडून प्लास्टिक वापरणार नाही असं या प्रतिज्ञापत्रात नमूद करून घेणार असल्याचं रामदास आठवले यांनी सांगितलं.
हे झाल्यानंतरही जर दुकानात प्लास्टिकची पिशवी आढळली तर दुकानाचा परवाना रद्द करण्यात येईल, प्लास्टिक वापरणाऱ्याचे दुकान कायमचे बंद करण्यात येईल. याबद्दल पुढील आठवड्यात अंतिम निर्णय घेण्यात येईल अशी माहितीही रामदास कदम यांनी दिली.
सर्वांना पुरेशी संधी देण्यात आली आहे, आता कारवाईला समोरं जावं लागेल असा इशाराही कदम यांनी दिला.
प्लास्टिक बंदी बाबत आढावा बैठक रामदास कदम यांनी घेतली. त्यानंतर मी त्यांची भेट घेतली. प्लास्टिकबंदीची अंमलबजावणी ६० टक्के झालीये. ९० टक्के कारवाईही कायद्याने सुरू आहे. प्लास्टिक बंदीची अंमलबजावणी पुढे कशी करायची, लोकांमध्ये याबद्दल कशी जागृती करायची याबद्दल चर्चा झाली अशी माहिती आदित्य ठाकरे यांनी दिली. प्लास्टिक बंदीचं यश हे लोकांमुळे झालंय, रस्त्यावर प्लास्टिक कुठे दिसलं नाही पाहिजे यासाठी सरकारचे प्रयत्न असणार आहे असंही आदित्य ठाकरे म्हणाले.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours