मुंबई, 18 डिसेंबर : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या महाराष्ट्र दौऱ्याआधी शिवसेना-भाजपमध्ये पुन्हा एकदा तणाव निर्माण झाला आहे. कारण शिवसेनेच्या मंत्र्यांनी पंतप्रधान मोदींच्या कार्यक्रमाला जाऊ नये, असा आदेश शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिला आहे.
विविध विकासकामांच्या उद्घाटनासाठी नरेंद्र मोदी महाराष्ट्रात येत आहेत. या उद्घाटन सोहळ्याचं शिवसेना मंत्र्यांना निमंत्रण असलं तरीही पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना निमंत्रण देण्यात आलेलं नाही. त्यामुळेच आता मोदींच्या या कार्यक्रमाला मंत्र्यांनाही न पाठवण्याचा निर्णय शिवसेनेनं घेतला आहे.
उद्धव ठाकरेंच्या आदेशानंतर आता निमंत्रण असूनही राज्यमंत्री विजय शिवतारे हे पुण्याच्या तर एकनाथ शिंदे हे कल्याण इथल्या मेट्रो प्रकल्पांच्या भूमीपूजन कार्यक्रमाला जाणार नाहीत. यानिमित्ताने पुन्हा एकदा शिवसेना-भाजपमधील श्रेयवादाची लढाई समोर आली आहे. सोमवारी कोस्टल रोडचे उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन झाले. या कार्यक्रमाला भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी बहिष्कार टाकला होता.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महाराष्ट्रातील विकास प्रकल्पांवर चर्चा झाली. यावेळी 18 डिसेंबरला होणाऱ्या विकास प्रकल्पांच्या भूमीपूजन सोहळ्यात शिवसेनेला सहभागी करावं, यासाठी मुख्यमंत्र्यांनी आग्रही भूमिका मांडली. पण त्यास न पंतप्रधान कार्यलयाने मंजूरी दिली नाही.
विकास प्रकल्पांच्या उद्घाटनावेळी याआधीही भाजपने शिवसेनेला लांब ठेवलं होतं. त्याप्रमाणे आता लोकसभा निवडणुकांच्या तोंडावरही भाजपची हीच रणनीती असणार आहे का, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours