मुंबई, 09 फेब्रुवारी : राज्यातील काही भागांमध्ये थंडी पुन्हा वाढली आहे. येत्या 3 दिवसांमध्ये महाराष्ट्र आणि मराठवाडय़ात पुन्हा तुरळक पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. कोकण आणि विदर्भात हवामान कोरडे राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे.
तर इकडे महाबळेश्वरमधील तापमानात रात्री पासूनच अचानक घट होताना पाहायला मिळाली. आज सकाळी तर चक्क बर्फाची चादरच पाहायला मिळाली. दवबिंदू गोठण्यापर्यंतचं तापमान या ठिकाणी घसरलं आहे. वेण्णा लेक परिसरात जवळ पास 2 अंश सेल्सिअस एवढे तपमानात घट झाली आहे.
कालपासून मुंबईसह राज्यभरात थंडीचा कडाका जाणवतो आहे. पुढचे ३ ते ४ दिवस अशीच थंडी राहणार आहे असं भाकित हवामान खात्यानं वर्तवलं आहे. नाशिकसह मुंबई आणि पुण्यातही  पारा खाली घसरण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. तर मुंबई आणि कोकण किनारपट्टीवर शनिवार ते सोमवार या काळात तापमानात २-३ अंशांची घट होणार आहे. दरम्यान, आताची ही मुंबईतील विक्रमी थंडी असल्याचं सांगण्यात येत आहे. 
उत्तरेतून येणाऱ्या थंड वाऱ्यानं  राज्यातलं तापमान  घसरल्याचं हवामान खात्याकडून सांगण्यात येत आहे. राज्यात सध्यातरी गारपीटीची शक्यता नसल्याचं हवामान विभागानं स्पष्ट केलं आहे.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours