नवी दिल्ली, 29 मे : लोकसभा निवडणुकीत झालेल्या दारूण पराभवानंतर काँग्रेस पक्षात गोंधळ सुरू झाला आहे. पक्षाच्या पराभवाची जबाबदारी घेत राहुल गांधी यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याचं ठरवलं आहे. पण राहुल गांधींच्या या निर्णयाला काँग्रेसमधील इतर नेत्यांनी मात्र विरोध दर्शवला आहे. 
'राहुल गांधींनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यास मीही पद सोडणार,' अशी भूमिका राजस्थानचे उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांनी घेतल्याची माहिती आहे. याबाबत आयएएनएसने या वृत्तसंस्थेनं वृत्त दिलं आहे. त्यामुळे राहुल गांधी यांच्या राजीनाम्याने काँग्रेसच्या अडचणी आणखीनच वाढणार असल्याचं दिसत आहे. 
दरम्यान, राहुल गांधींनी जरी अध्यक्षपद सोडण्याचा प्रस्ताव दिला असला तरी या निमित्ताने काँग्रेस पक्षाच्या उच्च स्तरावर कोणते बदल होतात हे देखील महत्त्वाचे ठरणार आहे. पक्षावर आलेल्या या संकटाचा सामना करण्यासाठी अनेक मार्गांचा विचार केला जात आहे. केवळ केंद्रीय पातळीवरच नाही तर गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश आणि कर्नाटक या राज्यातील पक्षाची अवस्था बिकट आहे. त्यातच राहुल गांधींच्या निर्णयामुळे पक्षात आणखी गोंधळ वाढला आहे.

राहुल गांधींच्या निर्णयावर नाराज झालेल्या काँग्रेसमधील नेत्यांनी मंगळवारी सरचिटणीस प्रियांका गांधी यांची निवासस्थानी भेट घेतली. पक्षातील काही नेत्यांच्या मते राहुल गांधी यांचा राजीनाम्याचा निर्णय म्हणजे जबाबदारी पासून पळ काढण्यासारखा आहे. पण प्रियांका यांनी या नेत्यांनी स्पष्ट केले की राहुल गांधी पळ काढत नाही तर गांधी कुटुंबाशिवाय अन्य व्यक्तीने पक्षाचे नेतृत्व करावे. यासाठी प्रियांका यांनी काँग्रेसमध्ये याआधी नेहरू-गांधी कुटुंबाशिवाय अन्य व्यक्तींनी पक्षाचे नेतृत्व केल्याची उदाहरणे दिली.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours