मुंबई, 25 जुलै : राष्ट्रवादीचे मुंबई अध्यक्ष सचिन अहिर हे आज शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती आहे. यावर आता राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 'काही लोकांना आमदार न झाल्यास राजकारणच करता येत नाही, त्यामुळे ते असा निर्णय घेतात,' असा टोला अजित पवार यांनी सचिन अहिरांना लगावला आहे.
'काही लोकांना आमदार झालो नाही तर राजकारण करता येत नाही. यामुळे काहीजण काही निर्णय घेतात. राजकारणात हे घडत राहतं,' असं म्हणत अजित पवार यांनी सचिन अहिरांवर निशाणा साधला आहे. अजित पवारांनी अप्रत्यक्ष टीका केल्याने अहिर यांच्या शिवसेना प्रवेशावर जवळपास शिक्कामोर्तब झालं आहे.
'सचिन अहिर यांच्या शिवसेना प्रवेशाबाबत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील जास्त सांगू शकतील. अहिर आणि जयंत पाटील निकटवर्तीय आहेत. त्यामुळेच अजित पवार यांनी जयंत पाटीलांकडे बोट दाखवल्याचं दिसत आहे.
दरम्यान, सचिन अहिर हे आज शिवसेनेत पक्ष प्रवेश करणार असल्याची माहिती आहे. मातोश्रीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दुपारी 12 वाजता पत्रकार परिषदही बोलवली आहे. त्यामुळे सचिन अहिर दुपारीच शिवसेनेत प्रवेश करतील, अशी शक्यता आहे. सचिन अहिर यांचा शिवसेना प्रवेश राष्ट्रवादीसाठी मोठा धक्का असणार आहे. कारण अहिर हे राष्ट्रवादीचा मुंबईतील प्रमुख चेहरा होते. तसंच ते माजी मंत्रीही राहिले आहेत. त्यामुळे विधानसभा निवडणुकीआधी राष्ट्रवादीला मुंबईत मोठी गळती लागू शकते.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours