नवी दिल्ली: जम्मू काश्मीरला विशेष दर्जा देणारं कलम 370 काढून टाकायचा निर्णय निर्णय घेतल्यानंतर काश्मीर खोऱ्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्यानंतर देशात काही अनुचित घटना घडू नये म्हणून देशातल्या 19 विमानतळांवर अतिरिक्त सुरक्षा व्यवस्था तैनात ठेवण्यात आली आहे. एअरपोर्टवर प्रत्येकाची कसून तपासणी होईलच शिवाय एअरपोर्टपासून एक किलोमीटरपर्यंतच्या कुठल्याही वाहनाची तपासणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
देशभरातल्या 19 विमानतळांना इशारा देण्यात आला आहे. इथे हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुंबई व्यतिरिक्त दिल्ली, कोलकाता, हैदराबाद, बेंगळुरू, चेन्नई, इंफाळ, अमृतसर, तिरुवनंतरपुरम, लखनौ, रायपूर, जयपूर, पाटणा, भोपाळ, भुवनेश्वर, अहमदाबाद, डेहराडून आणि श्रीनगरमध्ये अलर्ट जारी करण्यात आला आहे.
मोबाईल जॅमरसुद्धा लावण्यात आले आहेत आणि काश्मीरमधले पर्यटक आधीच माघारी परतले आहेत. खोऱ्यातल्या शैक्षणिक संस्था बंद ठेवण्यात आल्या आहेत.   कलम 370 हटवण्याचं विधेयक लोकसभेत मंजूर झालं आणि सरकारच्या ऐतिहासिक निर्णयावर शिक्कामोर्तब झालं. काश्मीरमध्ये कोणत्याही स्वरूपाची घातपाताची घटना घडू नये यासाठी इथे कडेकोट सुरक्षाव्यवस्था ठेवण्यात आली आहे.
काश्मीरचा विशेष दर्जा रद्द करण्यासोबतच काश्मीरचं विभाजन करण्याच्या प्रस्तावालाही संसदेने मंजुरी दिली. त्यानुसार जम्मू-काश्मीर आणि लड़ाख हे दोन केंद्रशासित प्रदेश असणार आहेत. दरम्यान राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी काश्मीरमध्ये जाऊन तिथल्या सुरक्षेचा आढावा घेतला. मोदी सरकारचे जेम्स बाँड अशी ओळख असलेले अजित डोवाल हे प्रत्यक्ष 'ग्राउंड झीरो' वर जाऊन तिथल्या परिस्थितीचा आढावा घेत आहेत.अजित डोवाल हे काश्मीरच्या जनतेशी थेट संवाद साधत आहेत. सरकारच्या या निर्णयाला काश्मिरी जनतेचाही पाठिंबा आहे, असं या संवादातून माझ्या लक्षात आलं, असं अजित डोवाल म्हणाले.अजित डोवाल यांचा काश्मीरमधला एक व्हिडिओ ANI या वृत्तसंस्थेने ट्वीट केला आहे.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours