ठाणे:  घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा 'रिपब्लिकन' हा राजकीय विचार संपविण्याचा घाट प्रकाश आंबेडकरांकडून घातला जात असल्याचा गंभीर आरोप पीआरपीचे राष्ट्रीय अध्यक्ष जोगेंद्र कवाडे यांनी केलाय.  त्यामुळेच त्यांनी वंचित आघाडी उघडून रिपाइचे राजकीय विचार संपविण्याचा प्रयत्न सुरु केल्याची टीकाही त्यांनी केलीय. ठाण्यात एका पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांच्या समवेत रिपाइं एकतावादीचे राष्ट्रीय अध्यक्ष नानासाहेब इंदिसे हे देखील उपस्थित होते.
कवाडे म्हणाले, आंबेडकरांनी वंचित आघाडी तयार केली मात्र त्यात रिपाइला कुठेच स्थान नसल्याचही त्यांनी सांगितलं. याचा प्रत्यय लोकसभा निवडणुकीत स्पष्टपणे दिसून आला. त्यांना जर रिपाइचे विचार वाढवायचे असते तर त्यांनी सुशीलकुमार शिंदे यांच्या समोर उमेदवार उभा केला नसता. भाजपच वंचितला चालवित असल्याची शक्यताही त्यांनी यावेळी व्यक्त केली. सध्या आम्ही महाआघाडीचा घटक आहोत, त्यानुसार आगामी विधानसभा निवडणुकी संदर्भात काँग्रेस, राष्ट्रवादीबरोबर जागा वाटपाची चर्चा झाली आहे. मात्र आमचा सन्मान केला गेला नाही, तर मात्र आम्ही स्वबळावर राज्यात 51 जागा लढवू असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.
राज्यात कोल्हापुर, सांगली आदींसह इतर काही ठिकाणी पुरस्थिती निर्माण झालीय. असं असतांना दुसरीकडे भाजपचे नेते मंडळी शासकीय मदत पाकीटांवर आपले स्टीकर लावून प्रचार करतांना दिसत असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. शिवाय अशी परिस्थिती असतांना मुख्यमंत्री मात्र जनादेश यात्रेत मश्गुल असल्याचा टोलाही त्यांनी लगावला. आता ही यात्र बंद असली तरी ती पुन्हा सुरु होणार आहे. तिकडे देशाचे गृहमंत्री पुरग्रस्त भागांचा हेलीकॉप्टरद्वारे पाहणी दौरा करुन गेले, परंतु त्यांच्या सोबत मुख्यमंत्री नव्हते. त्यामुळे त्यांना येथील काय परिस्थिती समजणार असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours