पुणे : महसूलमंत्री आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे आपल्या वक्तव्यामुळे कायम वादात सापडतात. पुण्यात एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी जे वक्तव्य केलं त्यामुळे नव्याने वाद होण्याची शक्यता आहे. देशात बहुसंख्य हिंदू आहेत, त्यांना जसं वाटतं तसा देश चालेल असं मत त्यांनी एका कार्यक्रमात बोलताना व्यक्त केलं. त्यांच्या या वक्तव्यावर आता विरोधाचे सूर उमटत आहेत. भारताची घटना ही धर्मनिरपेक्ष आहे आणि देश घटनेनुसार चालतो. भारतात सर्वच धर्मांना समान अधिकार आहेत त्यामुळे राज्यांचे महत्त्वाचे मंत्री असं विधानच कसं करू शकतात अशी टीका विविध सामाजिक संघटनांनी केलीय.
चंद्रकांत पाटील हे पुण्यात श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट तर्फे आयोजित गणेशोत्सव पारितोषिक वितरण कार्यक्रमात बोलत होते. गणेशोत्सवाच्या काळात पोलीस आणि प्रशासनातर्फे अनेक अटी लादल्या जातात. देखावे पाहण्यावर निर्बंध लावले जातात. अशा अनेकांनी तक्रारी केल्या होत्या. त्यावर बोलताना ते म्हणाले, तुम्हाला त्रास द्यायला प्रशासन बसलेलं नाही. अधिकारीही हिंदू आहेत. त्यांनाही सण आहेत. तेही बायका पोरांना घेवून देखावे बघायला येतात. त्यामुळे गणेश मंडळांच्या मागण्यांबाबत प्रशासनाशी चर्चा काढून मार्ग काढू असं त्यांनी सांगितलं.
प्रशासन म्हणजे आपले विरोधक आहेत ही भावना मनातून काढून टाका असंही ते म्हणाले. गेल्या काही वर्षांमध्ये फक्त गणेशोत्सवावरच नाही तर अनेक सार्वजनिक उत्सवांवर अनेक बंधनं आली आहेत. उत्सवाचं होत असलेल्या बाजारीकरणामुळे कोर्टात याचिका दाखल केल्या जातात आणि कोर्ट निर्णय देतं. त्यामुळे अनेक उत्सवांवर बंधनं आली आहेत. तर कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी प्रशासनालाही काही उपाययोजना कराव्या लागतात. त्यामुळे उत्सव मंडळांना त्यांचा त्रास होतो.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours