मुंबई, 22 सप्टेंबर : विधानसभा निवडणुकांची नुकतीच घोषणा झाली आहे. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील वंचित बहुजन आघाडीदेखील या निवडणुकीत आक्रमकपणे उतरली आहे. पण लोकसभा निवडणुकीत वंचितकडून सर्वाधिक मतं घेतलेल्या उमेदवारानेच पक्षाचं टेन्शन वाढवलं आहे.
भाजपपासून दूर झालेले धनगर समाजाचे आक्रमक नेते गोपीचंद पडळकर यांनी लोकसभा निवडणुकीआधी वंचित बहुजन आघाडीत प्रवेश केला. त्यानंतर वंचितने सांगली मतदारसंघातून गोपीचंद पडळकर यांना उमेदवारी दिली. या निवडणुकीत झालेल्या तिरंगी सामन्यात गोपीचंद पडळकर यांनी विरोधी उमेदवारांना चांगली टक्कर देत तीन लाखांपेक्षा अधिक मतंही घेतली. पण लोकसभा निवडणुकीनंतर गोपीचंद पडळकर वंचितपासून काहीसे अलिप्त झाल्याची चर्चा आहे.
गोपीचंद पडळकर भाजपमध्ये जातील, अशी शक्यता गेल्या काही दिवसांपासून वर्तवण्यात येत आहे. पडळकर वंचितच्या प्रमुख कार्यक्रमांना गैरहजर राहत असल्याने या त्यांच्या पक्षबदलाच्या चर्चांना आणखीनच बळ मिळत आहे. लोकसभा निवडणुकीत वंचितच्या उमेदवारांमध्ये सर्वाधिक मते घेणारा आणि पश्चिम महाराष्ट्रात लोकप्रिय असलेला गोपीचंद पडळकरांसारखा नेता पक्षापासून दूर होत असल्याने वंचित डोकेदुखी वाढल्याचं बोललं जात आहे.
पडळकरांच्या मुद्द्यावरच वंचितमध्ये पडली होती फूट
'वंचित आघाडीमुळे भाजपचाच फायदा होत आहे. वंचितमध्ये आरएसएस आणि भाजपच्या लोकांनी घुसखोरी केली आहे,' असं म्हणत वंचितचे नेते लक्ष्मण माने यांनी प्रकाश आंबेडकरांवर गंभीर आरोप केले होते. यावेळी लक्ष्मण माने यांचा रोख आधी आरएसएसशी संबंधित असलेल्या गोपीचंद पडळकरांवरच होता.
काय होतं गोपीचंद पडळकरांचं उत्तर?
'लक्ष्मण माने यांना माझ्यावर आक्षेप होता तर त्यांनी याआधी झालेल्या वंचितच्या बैठकीत त्यावर भाष्य का केलं नाही? लोकसभा निवडणुकीनंतर आता दोन महिन्यांनी माने आमच्यावर आरोप करत आहेत. पक्षाने त्यांना प्रदेशाध्यक्षपद न दिल्यानेच ते असे आरोप करत आहेत,' असं म्हणत गोपीचंद पडळकर यांनी लक्ष्मण मानेंना उत्तर दिलं होतं.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours