सोलापूर, 02 सप्टेंबर : विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजमध्ये जोरदार इनकमिंग सुरू आहे. राष्ट्रवादी-काँग्रेसमधील अनेक दिग्गज नेत्यांनी भाजप-शिवसेनेमध्ये प्रवेश केला. यावरून विरोधकांनी टीकेची झोड उठवली आहे. यावर अमित शहांनी जोरदार पलटवार केला आहे. भाजपने जर पक्षाचं दार पूर्ण उघडलं तर शरद पवार आणि पृथ्वीराज चव्हाण यांच्याशिवाय राष्ट्रवादीत कोणीच उरणार नाही अशी बोचरी टीका केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी केली आहे. 'महाजनादेश यात्रे'च्या दुसऱ्या टप्प्याचा समारोप रविवारी सोलापूरमध्ये झाला. यावेळी अमित शाहांनी ही टीका केली आहे.
'मी पुन्हा येणार आहे, महाराष्ट्रात भाजपचीच सत्ता येणार आहे', असा पुनरुच्चार यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. विशेष म्हणजे अमित शाह उपस्थित असताना त्यांनी हे वक्तव्य केलं. अमित शाहांनी त्यांच्या भाषणात याला दुजोराही दिला आहे. यावेळी त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या कामाचं कौतुक केलं. तर 'भाजपने आतापर्यंत केलेल्या कामाचा लेखाजोखा सांगण्यासाठी भाजपने ही महाजनादेश यात्रा काढली आहे. जर राष्ट्रवादी-काँग्रेसमध्ये हिम्मत असेल तर त्यांनी इतक्या वर्षात काय केलं ते सांगावं' असंही अमित  शहा म्हणाले.
'फडणवीसांना दुसरी संधी द्या. त्यांना पुन्हा मुख्यमंत्री करणार ना?' असं थेट विधान शहांनी केलं. सिंचन घोटाळ्यावरून शहा यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा चांगलाच समाचार घेतला. आगाडीच्या सरकारनं भ्रष्टाचाराव्यतिरिक्त काहीही केलं नाही, उलट महाराष्ट्राला मागे नेलं, अशी परखड टीका शहा यांनी केली. सभा सुरू होण्याआधी शहा आणि फडणवीसांनी रोड शो केला. मुख्यमंत्र्यांच्या रथातूनच अमित शहाही सभास्थळी पोहोचले.
सोलापूर दौऱ्यावर असणारे अमित शहा सोमवारी मुंबई दौऱ्यावर असणार आहेत. सकाळी लालबागच्या राजाचं दर्शन घेतील आणि नंतर ते प्रभादेवीतील सिद्धिविनायक मंदिरात जातील. त्यानंतर ते आशिष शेलार यांच्या वांद्रे पश्चिम येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाला ते भेट देणार आहेत. तर चारच्या सुमाराला ते नवी दिल्लीला रवाना होतील.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours