मुंबई 29 ऑक्टोंबर : भाजप आणि शिवसेनेत सत्तेतला वाटा आणि मुख्यमंत्रिपदावरून रस्सीखेच सुरू आहे. दोन्ही पक्षांमध्ये कलगीतुरा रंगल्यानं ऐन दिवाळीत राजकीय कलगीतुरा रंगलाय. शिवसेनेचा दबाव वाढत असल्याने आता भाजपनेही आक्रमक भूमिका घेतलीय. मुख्यमंत्रीपदावर कुठलीही तडजोड करायची नाही यावर भाजप ठाम आहे. भाजपने शिवसेनेला उपमुख्यमंत्रीपदाबाबत अजून कुठलाही प्रस्ताव दिलेला नाही अशी माहिती सूत्रांनी दिलीय. मात्र उपमुख्यमंत्री पदाबाबत शिवसेनेने मागणी केल्यास भाजप चर्चेसाठी तयार आहे अशी माहितीही  सूत्रांनी दिली. कुठल्याही परिस्थितीत मुख्यमंत्री पद सोडायचं नाही आणि अडीच वर्षांचा फॉर्म्युलाही स्वीकारायचा नाही, पाच वर्षं पूर्ण पद  स्वतःकडेच ठेवण्यावर भाजप ठाम असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. त्यामुळे निर्माण झालेला हा पेच कसा सुटणार याकडे सगळ्यांच लक्ष लागलंय.
राज्यात विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर आता सत्ता स्थापनेचा संघर्ष सुरू झाला आहे. महायुतीची सत्ता स्थापन होईल असं म्हटलं जात असलं तरी सेना-भाजपमधल्या कुरबुरी संपण्याची चिन्हे दिसत नाहीत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 50-50 फॉर्म्युल्याची चर्चा झालीच नव्हती असं म्हटल्यानंतर आता खळबळजनक माहिती समोर येत आहे. सेना-भाजपमध्ये 50-50 फॉर्म्युल्याची चर्चा झाली मात्र त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित नव्हते अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

सरकारमध्ये अर्धा वाटा मिळावा यासाठी सध्या सेनेकडून ठाम भूमिका घेतली जात आहे. खासदार संजय राऊत यांच्या वक्तव्यानंतर सेना भाजपमध्ये सर्वकाही आलबेल नसल्याची चर्चा सुरू झाली होती. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सेनेला 50-50 चे आश्वासन दिले नव्हते असं म्हटलं होतं. सेनेकडून सातत्यानं आधी ठरलं तेच झालं पाहिजे अशी मागणी होत असताना मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्याने खळबळ उडाली होती. यातच आता 50-50 फॉर्म्युल्याबाबतची चर्चा दोन्ही पक्षांच्या अध्यक्षांमध्ये झाल्याची माहिती समोर येत आहे. भाजपाध्यक्ष अमित शहा आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात ही चर्चा झाली होती अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours