भिवंडी, 11 ऑक्टोबर : रस्त्यावरील खड्ड्यांनी एका डॉक्टरचा बळी घेतली. भिवंडी वाडा रोडवर ही घटना घडली. घटनेची माहिती मिळताच श्रमजीवी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी अनगावमधला टोलनाका बंद पाडला. डॉक्टर नेहा शेख यांच्या मृत्यूनं परिसरावर शोककळा पसरली. पुढच्याच महिन्यात नेहाचं लग्न होणार होतं.
डॉक्टर नेहा शेख हिचा रस्त्यातल्या या खड्ड्यानं बळी घेतला. नोव्हेंबर महिन्यात नेहाचं लग्न होणार होतं. त्यासाठी तिची खरेदी सुरू होती. खरेदी करून घरी परतत असताना तिची दुचाकी खड्ड्यात आदळल्यानं नेहा खाली पडली. आणि तिथंच घात झाला. पाठीमागून येणाऱ्या ट्रकच्या चाकाखाली येऊन नेहाचा मृत्यू झाला. त्यामुळे श्रमजीवी संघटनेच्या संतप्त कार्यकर्त्यांनी टोल नाका बंद पाडला.
डॉक्टर नेहा शेखच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या सुप्रीम कंपनीवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी दुगाड फाटामध्ये रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. खड्ड्यांची समस्या भीषण असल्यामुळे नागरिकांना जीव गमवावा लागत आहे. मात्र, प्रशासनाच्या पातळीवर कोणत्याही उपाययोजना केल्या जात नाहीत, यामुळे सामान्यांमध्ये चीड निर्माण होतेय.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours