मुंबई, 22 ऑक्टोबर : विधानसभा निवडणुकीसाठी मतदानाचा टप्पा पूर्ण झाला आहे. मतदानानंतर सर्वच एक्झिट पोलचे अंदाज समोर आले असून महायुतीचे सरकार पुन्हा सत्तेत येणार अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. राज्यातील मुख्य लढती पैकी लातूरची लढत महत्त्वाची मानली जात आहे. लातूर शहर आणि ग्रामीणमधून देशमुख कुटुंबातून अमित आणि धीरज देशमुख निवडणुकीच्या आखाड्यात उतरले आहे. परंतु, एका भावासाठी गोड बातमी तर दुसऱ्यासाठी वाईट बातमी समोर आली आहे.
न्यूज 18 लोकमत आणि आणि IPSOS ने केलेल्या मतदानोत्तर चाचणीत भाजप आणि शिवसेनेच्या सत्तेचा मार्ग मोकळा केला आहे. लातूरमध्ये काँग्रेसचे दिवंगत नेते आणि माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांची मुलं अमित आणि धीरज दोघेही निवडणूक लढवत आहे. अमित हे तिसऱ्यांदा लातूर शहरातून निवडणूक लढत आहे. तर धीरज देशमुख हे पहिल्यांदाच निवडणुकीला उभे राहिले आहे. लातूर शहरातून अमित देशमुख यांना पराभवाचा सामना करावा लागणार, असा अंदाज वर्तवला आहे. तर लातूर ग्रामीणमधून धीरज हे बाजी मारणार अशी शक्यता आहे. लातूर शहर मतदारसंघातून काँग्रेस उमेदवार अमित देशमुख हे तिसऱ्यांदा आपलं नशीब आजमावत आहेत. त्यांच्या विरोधात गेल्या वेळी अल्प मतांनी पराभूत झालेले भाजपचे शैलेश लाहोटी हे पुन्हा एकदा रिंगणात आहेत. 2014 ला लातुरात भाजपची जिल्हा परिषद किंवा महानगर पालिकेत देखील सत्ता नव्हती. मात्र, आता जिल्हा परिषद आणि महानगरपालिका भाजपच्या ताब्यात आल्यामुळे या मतदार संघाची समीकरनं बदलू शकतात. शिवाय वंचित फॅक्टर चाललाच तर शैलेश लाहोटीचा विजय निश्चित मानला जात आहे.
धीरज यांचा ग्रामीणमध्ये झंझावत
धीरज देशमुख यांनी जिल्हा परिषद सदस्य म्हणून या अगोदर राजकारणाचे धडे गिरवले आहेत. वडील विलासराव देशमुख आणि मोठा भाऊ अमित देशमुख यांच्यामुळे धीरज राजकारण जवळून पाहिलं आहे. विशेष म्हणजे, ग्रामीण भागात मोठा वारसा आला. विलासराव देशमुख यांना मानणारा मोठा वर्ग या भागात आहे. त्याचा फायदा त्यांना मिळणार असल्याची शक्यता आहे. शिवाय काँग्रेसला मानणारा मोठा मतदार असल्याने त्यांना फायदा होण्याची शक्यता आहे. मात्र बदलतं राजकारण, भाजपचा वाढता प्रभाव आणि नरेंद्र मोदींचा करिष्मा आणि प्रस्थापितांविरूद्धची हवा यामुळे धीरज देशमुखांना ही निवडणूक सोपी जाणार नाही, असंही म्हटलं जातंय. परंतु, आज एक्झिट पोलमधून धीरज यांचा आमदार होण्याचा मार्ग मोकळा केला आहे.

मराठवाडा - एक्झिट पोलचा अंदाज 2019 (एकूण जागा -48)
महायुती - 44
महाआघाडी - 4
भाजप - 23
शिवसेना - 21
काँग्रेस- 2
राष्ट्रवादी - 2
इतर - 00
काँग्रेसच्या या 3 मोठ्या नेत्यांना हादरा
राज्यातली काँग्रेसची धुरा आपल्या हाती सांभाळणारे बाळासाहेब थोरात यांनाच सर्वात मोठा धक्का बसणार आहे. कारण, न्यूज 18 लोकमत आणि आणि IPSOS ने केलेल्या मतदानोत्तर चाचणीत थोरात पराभूत होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. बाळासाहेब थोरात यांच्यापाठोपाठ काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि अशोक चव्हाण आपला गड कायम राखण्यात अपयशी ठरले आहे, असा अंदाजही समोर आलं आहे.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षच पराभूत?
लोकसभेत दारूण पराभवानंतर काँग्रेसमध्ये उदासीन वातावरण निर्माण झाले होते. राहुल गांधींनीच राजीनामा दिल्यानंतर पक्षात राजीनामास्त्र सुरू झाले होते. राज्यात अशोक चव्हाण यांनीही आपल्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर बाळासाहेब थोरात यांनी पक्षाची धुरा आपल्या खांद्यावर घेतली. बाळासाहेब थोरात विरुद्ध राधाकृष्ण विखे पाटील असा सामनाच विधानसभेत रंगला होता. परंतु, इथं विखे पाटील यांनी थोरातांना आस्मान दाखवल्याचं समोर येत आहे.
अशोक चव्हाणांच्या गडाला खिंडार?
लोकसभा निवडणुकीत अशोक चव्हाण यांनी प्रदेशाध्यक्ष म्हणून निवडणूक लढवली. परंतु, वंचित आघाडीच्या फॅक्टरमुळे अशोक चव्हाणांना पराभवाचा सामना करावा लागला. लोकसभेतील पराभवाची तूट भरून काढण्यासाठी अशोक चव्हाण मैदानात उतरले होते. त्यांच्याविरोधात भाजपकडून बापूसाहेब गोरठेकर यांना उमेदवारी दिली. चव्हाणांनी आपला गड कायम राखण्यासोबत पक्षाची पकड मजबूत करण्यासाठी प्रयत्न केला. परंतु, एक्झिट पोलमध्ये चव्हाणांच्या हाती पराभवच दाखवण्यात आला आहे.
बीडमध्ये पंकजा मुंडे मारणार बाजी?
News18 Lokmat आणि IPSOS ने केलेल्या मतदानोत्तर चाचणीत भाजप- शिवसेना महायुतीला मोठं बहुमत मिळणार असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. 288 जागा असलेल्या महाराष्ट्र विधानसभेत बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांचा आकडा गाठावा लागतो. महायुतीला 243 जागा मिळतील, असं या Exit Poll चा निकाल सांगतो. या पोलनुसार पंकजा मुंडे यांचं पारडं जड असल्याचं सांगण्यात येत आहे. तर धनंजय मुंडेंचा पराभव होणार आहे. परळी मतदारसंघ सगळ्यात जास्त गाजला तो मुंडे भाऊ-बहिणींमध्ये. दोघांमध्येही काँटे की टक्कर पाहायला मिळते. पण अशात धनंजय मुंडे यांना मोठा धक्का बसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
परळीमध्ये 2014 च्या विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडेंचा पराभव केला आणि त्या मंत्री झाल्या. आता 2019 च्या विधानसभा निवडणुकीत पुन्हा एकदा पंकजा मुंडेंची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours