नवी मुंबई, 03 एप्रिल : कोरोना व्हायरसनं आता मुंबईसह उपनगरांमध्येही थैमान घालण्यास सुरुवात केली आहे. गुरुवारी नवी मुंबईत दिवसभरात 9 नवीन कोरोनाचे पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये काहीसं भीतीचं वातावरण आहे. आतापर्यंत नवी मुंबईतील कोरोनाग्रस्तांची संख्या 22वर पोहोचली आहे. वाशीमध्ये 5, नेरूळमध्ये 2, कोपरखैरणेमध्ये 2 रुग्ण आढळले आहेत. हे सर्वजण कोरोना पॉझिटिव्ह असणाऱ्या लोकांच्या संपर्कात आल्यानं त्यांनाही कोरोनाची लागण झाल्याची माहिती मिळत आहे.
दुसरीकडे गुरुवारी आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या धारवीत तिसरा कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्यानं खळबळ उडाली आहे. दाटीवाटीच्या वस्तीत कोरोना वेगानं पसरला जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे. तर नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय बाहेर पडू नये असं आवाहन प्रशासनाकडून देण्यात येत आहे. सायन कोळीवाड्यातील पंजाबी कॅम्प येथे एक व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळला आहे. महाराष्ट्रात 81 नवे रुग्ण सापडले आहे. महाराष्ट्रात रुग्णांची संख्या आता 416वर पोहोचली आहे. तर मुंबईमध्ये कोरोनामुळे गुरुवारी 3 जणांचा मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आहे. आतापर्यंत महाराष्ट्रातील मृतांचा आकाडा 21वप पोहोचला आहे. तर 42 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.
कोरोनाला रोखण्यासाठी आरोग्य विभागाने राज्यातील 30 शासकीय रुग्णालये कोरोना उपचारासाठी विशेष रुग्णालये म्हणून घोषीत केली आहेत. या रुग्णालयांत केवळ कोरोना रुग्णांवर उपचार केले जाणार आहेत. त्यासाठी अधिसूचना काढण्यात आली असून 2305 खाटा कोरोनाबाधीतांच्या उपचारासाठी उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती केंद्रीय आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.
देशात कोरोनाचा विळखा आणखी घट्ट होत आहे. मरकज जमात प्रकरणानंतर रूग्णांची संख्या वाढली असून कोरोना रुग्णांची संख्या 2069 एवढी झाली आहे. कोरोनाचा वाढता प्रादूर्भाव रोखण्यासाठी 14 एप्रिलपर्यंत लॉकडाऊनच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्याच पार्श्वभूमीवर आज सकाळी 9 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी जनतेसोबत संवाद साधणार आहेत.
Post A Comment:
0 comments so far,add yours