मुंबई, 17 मे : 'मुंबईतून परप्रांतीय मजुरांनी मोठ्या प्रमाणात स्थलांतर केले आहे. आता त्यांच्या जागा मराठी तरुणांनी घ्यायला हव्यात, संधी आली आहे असं सांगितलं जात आहे. ते तितकेसे खरे नाही. जे निघून गेले ते सर्व असंघटित, रोजंदारीवर काम करणारे होते. मुंबईच्या आर्थिक नाड्या आजही परप्रांतीयांच्याच हाती आहेत हे सत्य कसे नाकारणार?' असं परखड सवाल शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे.
शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या 'सामना'च्या रोखठोक सदरातून संजय राऊत यांनी मुंबईतून परप्रांतीय मजूर आपल्या राज्यात गेल्यामुळे मराठी मुलांना रोजगारीची संधी आहे, अशी चर्चा रंगली होती. याच विषयाला हात घालत संजय राऊत यांनी रोखठोक सवाल उपस्थितीत केला आहे.
कोरोनानंतर मजुरांनी मुंबई-महाराष्ट्रातूनही मोठय़ा संख्येने स्थलांतर केले. झुंडीच्या झुंडी चालत निघाल्या. यावर काही राजकीय नेते म्हणाले, ”बरे झाले, हे संकटकाळी मुंबईतून पळून गेले. आता मराठी तरुणांनी या संधीचा फायदा घ्यावा.” केदार शिंदे हे शाहीर साबळे यांचे नातू. केदार शिंदे ट्विटरवर सांगतात, ”स्थलांतरित कामगार आता सर्व नोंदणी करून आपापल्या गावचा रस्ता धरतायत. आपल्याकडे त्यांचा ‘डाटा’ उपलब्ध झालाय. मराठी तरुणांना ते करीत असलेल्या कामांची माहिती करून द्यावी. मराठी तरुणांना हीच संधी आहे. नंतर गळे काढून रडू नका, त्यांनी कामं हिसकावली!” केदार शिंदे यांच्या मताशी अनेकांनी सहमती व्यक्त केली. जणू आता मुंबई रिकामीच झाली. नोकऱ्या रिकाम्या झाल्या. मराठी पोरांनी जाऊन फक्त हजेरी लावायला सुरुवात करायची आहे. प्रत्यक्षात तसे चित्र आहे काय? असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला.
'मराठी तरुणांचे कल्याण होईल असं नाही'
'जो मजूरवर्ग चालत उत्तर प्रदेश, बिहारकडे गेला त्याची जागा बेरोजगार मराठी तरुण घेईल असे वाटत नाही. हा संपूर्णपणे असंघटित मजूरवर्ग होता. तो रोजंदारीवर कंत्राटी पद्धतीने काम करीत होता. रोजची मजुरी हेच त्याचे उपजिविकेचे साधन होते. हा बहुसंख्य मजूरवर्ग कोठे होता? तर बांधकाम व्यवसायात, रस्ते, पूल उभारणीच्या कामात,  कंत्राटी पद्धतीच्या सुरक्षा रक्षकात, घरेलू कामगार किरकोळ स्वरूपातील भाजी-फळ विक्रेता, मॉलमधली साफसफाई करणारा, रेल्वे रुळांवर खडी टाकणारा कामगार, पाणीपुरी, भेळपुरी, चणे विकणारा, दूधवाला, इस्त्रीवाला असं काम करणारे हे हजारो लोक असंघटित कामगार आहेत. त्यांना कोणतेही वर्तमान आणि भविष्य नव्हतेच. ते भीतीने मुंबईसारखी शहरे सोडून गेले या सर्व ‘संधी’ आहेत व आता मराठी तरुणांचे कल्याण होईल, असे म्हणता येणार नाही', असं मत राऊत यांनी व्यक्त केलं.
'मराठीपणावर डंख मारणारे आहे तिथेच आहेत'
' मराठी तरुण कष्ट करायला मागे हटत नाही, पण तो रेल्वे रुळांवर खडी टाकणार नाही. बांधकाम मजूर म्हणून घमेली उचलणार नाही. हा बांधकाम व्यवसाय आज आपल्या हातात नाही. सिंग, चौबे, दुबे, मिश्रा, नटराजन, मेनन, पारेख, मेहता सगळे जेथच्या तेथेच आहेत. बिन चेहऱयाचे, छप्पर नसलेले, चुली विझून फक्त राख साचलेले लोकच मुंबई सोडून पायी चालत निघून गेले आहेत. मुंबईतील कॉर्पोरेट कंपन्या, सार्वजनिक उद्योगांवर भुजंगासारखे बसून मुंबईचे बाप आम्हीच असे सांगून मुंबईच्या मराठीपणावर डंख मारणारे आहे तिथेच आहेत. ते जाणारही नाहीत. कोरोनाला सोबत घेऊन जगायचे आहे तसे या मंडळींना घेऊनच मुंबईला जगावे लागेल', असं परखड मतही त्यांनी व्यक्त केलं.
शेठ’ मंडळींची जागा घ्यायला हवी'
मुंबईतील रेस्टॉरंट आणि त्यांचे उपरे मालक येथेच आहेत. त्यांचा मजूरवर्ग सोडून गेला. हे चित्र आज सर्वच क्षेत्रांत आहे. मॉल्स, टॉवर्स, जमिनी, मोठी इस्पितळे, शैक्षणिक संस्थांची मालकी आपल्याकडे नाही व या उद्योगांचे मालक मुंबईच्या टापूवर ‘शेठ’ म्हणून बसलेच आहेत. ‘शेठ’ मंडळींची जागा घेण्याचे काम व्हायला हवे. स्थलांतरित मजुरांच्या जागा भरण्याचे स्वप्न आपण का बघायचे?, असा सवालही त्यांनी केला.
'फाळणीशी तुलना करू नये'
'मजुरांच्या स्थलांतराचे चित्र काळीज पिळवटून टाकणारे आहे. काहीजण या स्थलांतराची तुलना फाळणीशी करतात. हिंदुस्थान व पाकिस्तानातून असे स्थलांतर तेव्हा झाले, पण या सर्व स्थलांतरितांनी आपली घरे, जमीन-जुमले, नोकऱ्या आणि प्रतिष्ठा जेथच्या तेथे ठेवूनच आपापले देश सोडले. हिंदुस्थानातून पाकिस्तानात गेलेल्या अनेकांच्या इस्टेटी आताही हिंदुस्थानात आहेत व त्यांना enemy property असे संबोधले जाते. आताचे स्थलांतर हे देशांतर्गत आहे.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours