नवी दिल्ली, 05 जून : देशात कोरोनाचा वेगाने प्रसार होत आहे. रोज कोरोना रुग्णांच्या आकड्यांमध्ये वाढ होत आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण आहेत. त्यात मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या जास्त आहे. पण अशात एक मुंबईकरांसाठी एक दिलासादाय बातमी आहे. मुंबईत सर्वाधिक वाढणारी कोरोना रुग्णांची संख्या आता कमी झाली आहे. दिल्लीत एकादिवसामध्ये करोना रुग्णांच्या संख्येत पहिल्यांदाच मुंबईपेक्षा जास्त वाढ झाली आहे.

गेल्या चोवीस तासांमध्ये मुंबईत 1276 नव्या रुग्णांची भर पडली तर दिल्लीमध्ये ही संख्या 1513 इतकी होती. गेल्या आठवड्यात दिल्लीत सातत्याने प्रतिदिन एक हजार रुग्णांची वाढ होत आहे. त्याआधी प्रतिदिन वाढ सुमारे 800रुग्णांपर्यंत मर्यादित होती. दिल्लीत एकूण रुग्णांची संख्या 23 हजार 645 झाली असून त्यापैकी 9642 रुग्ण बरे झाले आहेत. खरंतर, आपण सर्वजण कोरोनाला कायमचं संपवण्यासाठी लढत आहोत. अशात मुंबई, काय आणि दिल्ली काय प्रत्येक शहरातून कोरोना नष्ट झाला पाहिजे. पण या बदलणाऱ्या आकड्यांमधून कुठे नियम कठोर केले पाहिजेत आणि कुठे शिथिलता द्यावी याची सरकारला मदत होणार आहे.

दरम्यान, राज्यात कोरना रुग्णाच्या संख्येत होत असलेली वाढ गुरुवारीही कायम होती. गेल्या 24 तासांमध्ये 2933 एवढ्या नव्या रुग्णांची भर पडली. त्यामुळे राज्यातल्या रुग्णांची एकूण संख्या तब्बल 77,793 एवढी झाली आहे. तर राज्यात काल 123 जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या 2710 एवढी झाली आहे.

सगळे प्रयत्न करूनही आकडा कमी होत नसल्याने सरकारची चिंता वाढली आहे. मृत्यू झालेल्यांमध्ये 68 जण हे मुंबई आणि ठाण्यातले आहेत. काल 1352 एवढे रुग्ण बरे झालेत. तर आत्तापर्यंत राज्यात 33681 रुग्ण बरे झाले आहेत. राज्यात रुग्ण बरे होण्याचं प्रमाण हे 43.29 टक्के एवढं आहे. तर मृत्यूचं प्रमाण 3.48 टक्के एवढं आहे.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours