मुंबई :  अनलॉक नंतर वर्दळ वाढल्याने आता महाराष्ट्राची चिंता वाढली आहे. आजही राज्यात दोन हजारांपेक्षा जास्त म्हणजे तब्बल 2259 रुग्ण आढळले. त्यामुळे राज्यातल्या एकूण रुग्णांची संख्या 90 787  झाली आहे. गेली काही दिवस राज्यात दररोज अडीच ते तीन हजारांच्या जवळपास रुग्ण सापडत आहेत. त्यामुळे लवकरच राज्यातला आकडा 1 लाखांच्या पुढे जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे. राज्यात आज 120 जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे मृतांची संख्या 3289 एवढी झाली आहे.

तर पुण्यात लॉकडाऊन संपल्यानंतर कोरोनाचा व्हायरस आता ग्रीनझोनमधील झोपडपट्ट्यांमधून मोठ्या झपाट्याने पसरत असल्याचं आढळून आलं आहे. खासकरून सिंहगड रोडवरील पाणमळा आणि जनता वसाहतीमध्ये तर कोरोना रूग्णांची संख्या साडेतीनशेच्यावर पोहोचलीय त्यामुळे पालिकेनं हा परिसर पत्रे ठोकून सील करून टाकला आहे. गेल्या काही दिवसांपासून मिळत असलेली सुट आणि अनलॉक नंतर मोठ्या प्रमाणात वाहतूक वाढली आहे. त्याचा परिणाम म्हणून संख्या वाढत असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

या भागातले रहिवासी कॅनॉलच्या पाईपवरून धोकादायक पद्धतीने येजा करत असल्याने अपघाताचाही धोका वाढला आहे. पुणे शहरात रुग्णांचा संख्या वाढत असतानाच हे नवे हॉटस्पॉट तयार होत असल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours