मुंबई: गणेशोत्सवाला अवघे काही दिवस उरले असताना नवी मुंबईतील रस्ते खड्डेमय बनले आहेत. त्यामुळे गणेशभक्तांना आपल्या लाडक्या गणरायाला खड्ड्यांतून वाट काढत आणावे लागण्याची शक्यता आहे. नवी मुंबई महापालिकेने अंतर्गत रस्त्यांवरील खड्डे तात्काळ बुजवावे, अन्यथा मनपा अभियंत्यांची आरती ओवाळू असा जाहीर इशारा नवी मुंबई मनसे शहर अध्यक्ष गजानन काळे यांनी नवी मुंबई महानगरपालिका शहर अभियंता मोहन डगावकर यांना प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिला आहे.
गणरायाच्या स्वागतासाठी घरगुती व सार्वजनिक मंडळांची जय्यत तयारी सुरु झाली आहे. मात्र मनपाच्या उदासीनतेमुळे नेरूळ, सीवूड्स, जुईनगर, सानपाडा, वाशी, घणसोली, कोपरखैरणे, ऐरोली येथील रस्त्यांची अत्यंत दुरवस्था झाली आहे. त्याचा फटका बाप्पाची मूर्ती आणताना गणेश भक्तांना बसणार आहे. काही ठिकाणी खड्डे बुजविण्याचे तकलादू काम केल्याने पहिल्या पावसातच तेथे पुन्हा खड्डे पडले आहेत. अनेक कंत्राटदारांनी आवश्यकतेपेक्षा कमी जाडीचा खडीचा थर रस्त्याखाली टाकल्यामुळे सगळ्या खडी रस्त्यावर आल्या आहेत. तर काही ठिकाणी खड्ड्यांमध्ये पेव्हर ब्लॉक टाकून डागडुजीचा निव्वळ फार्स केल्याचे मनसेने म्हटले आहे. रस्त्यांच्या डांबरीकरण व दुरुस्तीसाठी वापरलेले साहित्य निकृष्ट दर्जाचे होते की काय? अशी शंका येत असल्याचा आरोप मनसेचे उपशहर अध्यक्ष संदीप गलुगडे, निलेश बाणखेले, नितीन चव्हाण, विनोद पार्टे यांनी प्रसिद्धीपत्रकात केला आहे.
एकदा बनविलेले रस्ते काही दिवसांमध्ये कसे खड्डेमय होतात? असा प्रश्न मनसे शहर सचिव श्रीकांत माने, रुपेश कदम, विलास घोणे व सचिन आचरे यांनी उपस्थित केला आहे. इतकेच काय आयुक्त निवासस्थानाबाहेर व शहर अभियंत्याच्या सोसायटी बाहेरील रस्त्यालाही खड्डे पडलेले आहेत असा आरोप मनसेने प्रसिद्धीपत्रकाद्वारे केला आहे. त्यामुळेच गणेशोत्सवापूर्वी खड्डे न बुजवल्यास अभियंत्यांची आरती ओवाळू असा जाहीर इशारा शहर अध्यक्ष गजानन काळे यांनी दिला आहे.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours